Skip to content
Bhagavad Gita Chapter 2 in Marathi PDF Download

Bhagavad Gita Chapter 2 in Marathi PDF Download

दुसरा अध्याय : सांख्ययोग

  • पहिल्या अध्यायात गीतेत दिलेल्या उपदेशाच्या प्रस्तावनेच्या रूपात दोन्ही सैन्यांच्या महारथींचे व शंखध्वनी केल्यानंतर अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्याचे वर्णन येते. नंतर दोन्ही पक्षांतील आपल्या नातलगांना पाहून शोक व मोहामुळे अर्जुनाने युद्धास नकार दिला आणि विषादग्रस्त होऊन शस्त्रास्त्रांचा त्याग केला. नंतर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कशा प्रकारे पुन्हा युद्धासाठी तयार केले, हे सर्व सांगणे आवश्यक असल्याने अर्जुनाच्या मनःस्थितीचे वर्णन करताना संजय दुसरा अध्याय आरंभ करतो.

।। अथ द्वितीयोऽध्याय: ।।

  • संजय उवाच :

तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदन: ।।1।।

  • संजय म्हणाला : करुणेने भारावलेल्या, अश्रूंनी डोळे भरून आलेल्या त्या विषादग्रस्त अर्जुनाला पाहून श्रीमधुसूदन म्हणाले.
  • श्रीभगवानुवाच :

कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ।।2।।
क्लैब्यं मा स्म गम: पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ।।3।।

  • श्रीभगवान म्हणाले : हे अर्जुन ! युद्धाच्या या बिकट प्रसंगी हे अज्ञान तुझ्यात कोठून आले ? हे आर्यांना न शोभणारे, असलेली कीर्ती धुळीस मिळविणारे आणि स्वर्गलोक गमविणारे आहे. हे अर्जुन ! अशा हीन नपुंसकतेची कास धरू नकोस. तुला हे शोभत नाही. हे परंतप ! हृदयाची तुच्छ दुर्बळता त्यागून युद्धासाठी सज्ज हो.
  • अर्जुन उवाच :

कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभि: प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ।।4।।

  • अर्जुन म्हणाला : हे मधुसूदन ! हे अरिसूदन ! मला पूजनीय असलेल्या भीष्मपितामह व द्रोणाचार्यांशी मी रणांगणावर कसा लढू?

गुरूनहत्वा हि महानुभावा-ञ्छ्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान्रुधिरप्रदिग्धान् ।।5।।

  • या थोर, पूज्य गुरुजनांना न मारता या जगात भिक्षान्न खाऊन जगणेही मला अधिक कल्याणप्रद वाटते. कारण या गुरुजनांना मारून त्यांच्या रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच मला येथे भोगावे लागतील ना ?

न चैतद्विद्म: कतरन्नो गरीयो-यद्वा जयेम यदि वा नो जयेयु: ।
यानेव हत्वा न जिजीविषाम-स्तेऽवस्थिता: प्रमुखे धार्तराष्ट्रा: ।।6।।

  • युद्ध करणे अथवा न करणे, या दोहोंपैकी काय श्रेष्ठ आहे ते आम्हाला कळत नाही तसेच आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेदेखील आम्हाला माहीत नाही आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याची मुळीच इच्छा नाही, ते धृतराष्ट्रपुत्र तर आमच्या समोर युद्धाला उभे ठाकले आहेत.

कार्पण्यदोषोपहतस्वभाव: पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता: ।
यच्छ्रेय: स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ।।7।।

  • स्वजनांविषयीच्या मोहामुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि चित्ताला योग्य काय ते कळेनासे झाले आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी धर्माला अनुसरून निश्चितपणे सर्वांत श्रेयस्कर काय आहे, याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. मी तुम्हाला शिष्यभावाने शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश द्यावा.

न हि प्रपश्यामि ममापनुद्या-द्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं-राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ।।8।।

  • पृथ्वीचे निष्कंटक, धनधान्यसंपन्न राज्य मिळाले, किंबहुना इंद्रपद मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही.
  • संजय उवाच :

एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेश: परन्तप ।
न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ।।9।।

  • संजय म्हणाला : राजन् ! निद्रेला जिंकणाऱ्या परंतप अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना याप्रमाणे सांगितले आणि ‘हे गोविंद ! मी मुळीच युद्ध करणार नाही’ असे पुन्हा स्पष्टपणे सांगून तो गप्प बसला.

तमुवाच हृषीकेश: प्रहसन्निव भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वच: ।।10।।

  • हे भरतवंशजा ! दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभे राहून अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण विषण्ण होऊन बसलेल्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले.
  • श्रीभगवानुवाच :

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिता: ।।11।।

  • श्रीभगवान म्हणाले : हे अर्जुन ! तू ज्यांच्याबद्दल शोक करू नये, त्यांच्याबद्दल शोक करतोस आणि वर शहाणपणाच्या गोष्टीही सांगतोस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतकांबद्दलही शोक करीत नाहीत.

न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपा: ।
न चैव न भविष्याम: सर्वे वयमत: परम् ।।12।।

  • ज्याकाळी मी, तू आणि हे सर्व राजेलोक अस्तित्वात नव्हते, असा काळ कधीही नव्हता तसेच आपण सर्वजण यापुढे नसणार असेही नाही.

देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ।।13।।

  • ज्याप्रमाणे जीवात्म्याला या देहात बालपण, तारुण्य व वार्धक्य येते, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहात प्रवेश करतो. हे जाणणाऱ्या धीर, विवेकी पुरुषाला त्याबाबतीत दुःख होत नाही.
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदु:खदा: । आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ।।14।।
  • हे कौंतेय ! तात्पुरती उत्पन्न होणारी व यथायोग्यकाळी विनाश पावणारी जी सुख-दुःखे आहेत, ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या-जाण्याप्रमाणे अनित्य आहेत. हे भरतवंशजा ! ती सुख-दुःखे इंद्रियांचे विषयांशी संयोग झाल्याने निर्माण होतात, म्हणून तू क्षुब्ध न होता त्यांना सहन कर.

यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ।।15।।

  • हे पुरुषश्रेष्ठ ! सुख-दुःखांनी विचलित न होणाऱ्या व दोन्ही अवस्थांमध्ये सम राहणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषय व्याकूळ करीत नाहीत, तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य अर्थात् पात्र आहे.

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभि: ।।16।।

  • असत् अर्थात् अनित्य वस्तू कधीच अस्तित्वात नसते आणि सत् अर्थात् नित्य वस्तू कधीही नाहीशी होत नाही. याप्रमाणे तत्त्वज्ञानी पुरुषांनी या दोहोंचेही तत्त्व जाणले आहे.

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ।।17।।

  • ज्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे, त्याला तू अविनाशी जाण. या अविनाशी तत्त्वाचा नाश करण्यात कोणीही समर्थ नाही.

अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता: शरीरिण: ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ।।18।।

  • या अविनाशी, अप्रमेय (कोणत्याही प्रमाणाने न कळणाऱ्या) व नित्यस्वरूप जीवात्म्याचे हे सर्व देह नाशवंत म्हटले गेले आहेत. अर्थात् जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे, म्हणून हे भरतवंशी अर्जुन ! तू युद्ध कर.

य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ।।19।।

  • जो या आत्म्याला मारणारा समजतो आणि जो याला मेलेला समजतो, ते दोघेही खरे जाणत नाहीत. कारण हा आत्मा कोणाला मारतही नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही.

न जायते म्रियते वा कदाचि-
न्नायं भूत्वा भविता वा न भूय: ।
अजो नित्य: शाश्वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे ।।20।।

  • हा आत्मा कधीही जन्मत नाही किंवा मरतही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही; कारण आत्मा हा अजन्मा, नित्य, सनातन व पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही.

वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।
कथं स पुरुष: पार्थ कं घातयति हन्ति कम् ।।21।

  • हे पार्थ ! जो पुरुष जाणतो की हा आत्मा अविनाशी, नित्य, अजन्मा आणि अव्यय (अक्षय) आहे, तो पुरुष कोणाला कसा बरे मारेल किंवा दुसऱ्याकडून कसा मारून घेईल ?

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । 
तथा शरीराणि विहाय जीर्णा-न्यन्यानि संयाति नवानि देही ।।22।।

  • जसे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून दुसरी नवी वस्त्रे धारण करतो, तसेच जीवात्मासुद्धा जुन्या शरीरांचा त्याग करून दुसऱ्या नवीन शरीरांना धारण करतो.

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ।।23।।

  • या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही.

अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्य: सर्वगत: स्थाणुरचलोऽयं सनातन: ।।24।।

  • हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजविता न येणारा आणि सुकविता न येणारा आहे. हा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे.

अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ।।25।।

  • हा आत्मा अव्यक्त (इंद्रियांना अगोचर), अचिंत्य (तर्काने न समजणारा) आणि विकाररहित (कधी न बदलणारा) म्हटला जातो. म्हणून हे अर्जुन ! या आत्म्याला अशा प्रकारचा जाणून तू शोक करावयास योग्य नाहीस अर्थात् तू शोक करणे उचित नाही.

अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ।।26।।

  • आणि जरी तू याला सदा जन्मणारा व सदा मरणारा मानत असशील, तरीदेखील हे महाबाहू ! तू याच्याविषयी शोक करणे योग्य नाही.

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ।।27।।

  • कारण असे असल्यामुळे जन्म झालेल्याचा मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू झालेल्याचा पुन्हा जन्म अटळ आहे. म्हणून टाळता न येणाऱ्या गोष्टीबद्दल शोक करणे तुला उचित नाही.

अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ।।28।।

  • हे अर्जुन ! सर्व जीव जन्मापूर्वी शरीररहित होते आणि मृत्यूनंतरही शरीररहितच होणार आहेत; केवळ मध्यंतरीच शरीरधारी दिसत आहेत, तर मग याविषयी चिंता कसली ?

आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेन-माश्चर्यवद्वदति तथैव चान्य: ।
आश्चर्यवच्चैनमन्य: शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ।।29।।

  • एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याच्या वस्तूप्रमाणे पाहतो आणि त्याचप्रमाणे दुसरा एखादा महापुरुष याच्या तत्त्वाचे आश्चर्यासारखे वर्णन करतो तसेच दुसरा एखादा अधिकारी पुरुषच आश्चर्यकारक गोष्ट ऐकावी तसे याच्याविषयी ऐकतो. परंतु कोणी कोणी तर याच्याबद्दल ऐकूनही या आत्म्याला मुळीच जाणत नाहीत.

देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ।।30।।

  • हे भारत ! सर्वांच्या शरीरात असणाऱ्या आत्म्याचा कधीही नाश करता येत नाही, तो अवध्य आहे. म्हणून सर्व प्राणिमात्रांविषयी तू शोक करण्यास योग्य नाहीस.

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ।।31।।

  • शिवाय स्वधर्माकडे पाहिले असताही तू भयभीत होणे योग्य नाही, कारण क्षत्रियाला स्वधर्मोचित युद्धाहून अधिक असे दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही.

यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिन: क्षत्रिया: पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ।।32।।

  • हे पार्थ ! तुझ्या सुदैवाने आपोआपच प्राप्त झालेले हे युद्ध जणू उघडलेले स्वर्गाचे द्वारच आहे. अशा प्रकारचे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते.

अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।
तत: स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ।।33।।

  • जर तू हे धर्मोचित युद्ध केले नाहीस तर स्वधर्म व कीर्ती गमावून बसशील आणि तुला निश्चितपणे पाप लागेल.

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ।
सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ।।34।।

  • शिवाय सर्व लोक चिरकाळ राहणाऱ्या तुझ्या अपकीर्तीविषयी बोलत राहतील आणि सन्मान्य पुरुषासाठी अपकीर्ती मरणाहूनही अधिक वाईट असते.

भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथा: ।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ।।35।।

  • महारथी तुला ‘घाबरून तू रणांगणातून पाय काढलास’ असे समजतील आणि ज्यांना तुझ्याविषयी अत्यंत आदर होता, तेच तुला तुच्छ मानतील.

अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिता: ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दु:खतरं नु किम् ।।36।।

  • तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील आणि अनेक प्रकारचे बोलू नयेत असे अपशब्द तुला बोलतील. मग याहून अधिक दुःख ते कोणते ?

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय: ।।37।।

  • एकतर तू युद्धात मारला जाऊन स्वर्गात जाशील अथवा युद्ध जिंकून पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कौंतेय ! तू दृढ निश्चय करून युद्धासाठी सज्ज हो.

सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ।।38।।

  • सुख-दु:ख, लाभ-हानी व जय-पराजय यांना समान समजून तू युद्ध कर. अशा रितीने युद्ध केल्यास तुला पाप लागणार नाही.

एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ।।39।।

  • हे पार्थ ! आतापर्यंत मी तुला ज्ञानयोगाबद्दल सांगितले. आता मी कर्मयोगाविषयी सांगतो, ऐक. जर तू या ज्ञानाने युक्त होऊन कर्म केलेस तर कर्मांचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील अर्थात् कर्मबंधनातून योग्यप्रकारे मुक्त होशील.

नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ।।40।।

  • या कर्मयोगात आरंभाचा अर्थात् बीजाचा नाश होत नाही आणि विरुद्ध फळ होण्याचा दोषही यात घडत नाही, उलट या कर्मयोगरूपी धर्माचे थोडेसेही साधन जन्म-मरणरूपी महान भयापासून रक्षण करते.

व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ।।41।।

  • जे या कल्याण-मार्गावर असतात त्यांची बुद्धी निश्चयात्मक असते आणि त्यांचे ध्येयही एकच असते. परंतु हे कुरुनंदन ! जे अस्थिर वृत्तीचे असतात, त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात अर्थात् अस्थिर विचारांच्या, अविवेकी व सकाम मनुष्यांची बुद्धी निश्चितच भेददृष्टी ठेवणारी आणि अनियंत्रित असते.

यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चित: ।
वेदवादरता: पार्थ नान्यदस्तीति वादिन: ।।42।।

  • हे अर्जुन ! वेदांच्या आधारे कर्माची महती पटविणारे वेदवेत्ते तसेच यज्ञादी कर्मांच्या योगाने स्वर्गसुख भोगावे, त्यावाचून दुसरे सुखच नाही – असे म्हणणारे ही जी भुलविणारी कर्मफळविषयक भाषा बोलतात, ते दुर्बुद्धी होत.

कामात्मान: स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ।।43।।

  • विविध कामनांनी ग्रस्त, स्वर्गाच्या मागे लागलेले असे हे लोक विषयभोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठी अनेक विशेष धार्मिक क्रिया असलेली, जन्मरूप फळ देणारी कर्मे करतात.

भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धि: समाधौ न विधीयते ।।44।।

  • भोग व ऐश्वर्यात गढून गेलेल्या आणि त्या मोहक वाणीने चित्त हिरावून घेतलेल्या त्यांच्या अंतःकरणात परमात्मविषयक बुद्धी स्थिर होत नाही.

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वोे नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ।।45।।

  • वेद हे त्रिगुणात्मक आहेत. ते प्रामुख्याने प्रकृतीच्या तीन गुणांचे, सर्व भोगांचे तसेच त्यांच्या साधनांचे विवेचन करतात. हे अर्जुन ! तू या तिन्ही गुणांचा त्याग कर, सर्व द्वंद्वांतून मुक्त हो. योगक्षेमाची चिंता करू नकोस आणि सदैव आत्मपरायण हो.

यावानर्थ उदपाने सर्वत: सम्प्लुतोदके ।
तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत: ।।46।।

  • मनुष्याला सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाला असता लहानशा जलाशयाशी त्याचे जितके प्रयोजन राहते, तितकेच ब्रह्मला तत्त्वतः जाणणाऱ्या ब्राह्मणाचे (ज्ञानी पुरुषाचे) सर्व वेदांशी राहते.
    (अर्थात् मोठा जलाशय प्राप्त झाल्यानंतर ज्याप्रमाणे लहान जलाशयाची आवश्यकता राहत नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मानंदाची प्राप्ती झाल्यावर आनंदाप्रीत्यर्थ वेदांची आवश्यकता राहत नाही.)

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ।।47।।

  • कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, पण त्या कर्मफळाची आस्था मात्र मुळीच बाळगू नकोस. फळाचा हेतू न ठेवता तू स्वधर्मरूप कर्म कर तसेच कर्म न करण्याचेही मनात आणू नकोस.

योगस्थ: कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनंजय ।
सिद्ध्यसिद्ध्यो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते ।।48।।

  • हे धनंजय ! फळाची आशा सोडून, योगयुक्त होऊन कर्तव्यकर्मे कर. ती पूर्ण झाली असता आनंदाने हुरळून जाऊ नकोस किंवा अपूर्ण राहिल्याने खिन्न होऊ नकोस. पूर्णापूर्ण कर्मांविषयी चित्ताचा जो समभाव आहे, त्यालाच योग म्हणतात.

दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा: फलहेतव: ।।49।।

  • हे धनंजय ! समत्व बुद्धियोगयुक्त होऊन केलेल्या निष्काम कर्माच्या तुलनेत सकाम कर्म अगदीच निकृष्ट आहे. म्हणून तू समत्व बुद्धियोगाचाच आश्रय घे कारण फळाच्या आशेने कर्म करणारे अत्यंत दीन आहेत.

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम् ।।50।।

  • समबुद्धियुक्त मनुष्य पाप-पुण्य इहलोकीच त्यागून देतो, अर्थात् त्यांच्यापासून मुक्त होतो. म्हणून तू समत्वरूप योगासाठीच प्रयत्न कर. हा समत्वयोगच सर्व कर्मांतील कौशल्य अर्थात् कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे.

कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिण: ।
जन्मबन्धविनिर्मुक्ता: पदं गच्छन्त्यनामयम् ।।51।।

  • समबुद्धियुक्त विद्वान पुरुष कर्मे तर करतात पण फळाचा त्याग करतात, त्यामुळे जन्म-मरणरूपी बंधनातून मुक्त होऊन निर्विकार परम पदास प्राप्त होतात.

यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ।।52।।

  • जेव्हा तुझी बुद्धी मोहाच्या दलदलीतून पूर्णपणे बाहेर पडेल, तेव्हा इहलोक व परलोकासंबंधी ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या सर्व भोगांपासून तुला वैराग्य प्राप्त होईल.

श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ।।53।।

  • नाना तऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचल आणि स्थिर होईल, तेव्हा तुला समत्वरूप योग प्राप्त होईल अर्थात् परमात्म्याशी तुझा नित्य संयोग होईल.
  • अर्जुन उवाच :

स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधी: किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ।।54।।

  • अर्जुन म्हणाला : हे केशव ! समाधीत स्थित असा स्थितप्रज्ञ (स्थिरबुद्धी) पुरुष कोणत्या लक्षणांवरून ओळखावा ? तो कसा बोलतो ? कसा राहतो आणि कसा चालतो ?
  • श्रीभगवानुवाच :

प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्ट: स्थितप्रज्ञस्तदोच्यते ।।55।।

  • श्रीभगवान म्हणाले : हे पार्थ ! जो पुरुष मनातील सर्व कामनांचा जेव्हा त्याग करतो आणि आत्मसुखातच ज्याचे मन सर्वदा तृप्त असते, तेव्हा त्याला ‘स्थितप्रज्ञ’ म्हटले जाते.

दु:खेष्वनुद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह: ।
वीतरागभयक्रोध: स्थितधीर्मुनिरुच्यते ।।56।।

  • अनेक प्रकारचे दुःख आले तरी ज्याचे मन उद्विग्न होत नाही आणि सुख मिळाले तरी जो त्यात आसक्त होत नाही तसेच ज्याचे काम, क्रोध आणि भय सर्वथा नष्ट झाले आहेत, असा मुनी ‘स्थिरबुद्धी’ म्हटला जातो.

य: सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।57।।

  • जो प्राणिमात्रांविषयी दयाळू असूनही कोठेही आसक्त नसतो, काही बरे-वाईट झाल्याने ज्याला संतोष वा विषाद वाटत नाही, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजले पाहिजे.

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वश: ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।58।।

  • ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून आपली इंद्रिये संयमित करतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजले पाहिजे.

विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन: ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ।।59।।

  • इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या मनुष्याचे केवळ विषयच निवृत्त होतात, त्यांच्यातील आसक्ती नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीसुद्धा परमात्म्याच्या साक्षात्काराने निवृत्त होते.

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चित: ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मन: ।।60।।

  • हे कौंतेय ! आसक्तीचा नाश न झाल्यामुळे ही प्रबळ व उच्छृंखल इंद्रिये प्रयत्नरत बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही बळजबरीने विषयांकडे ओढून नेतात.

तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पर: ।
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।61।।

  • म्हणून त्या सर्व इंद्रियांना वश करून चित्ताचा माझ्याशी योग करून व मत्परायण होऊन रहावे. कारण ज्या पुरुषाची इंद्रिये त्याच्या स्वाधीन (वश) असतात, त्याची बुद्धी स्थिर होते.

ध्यायतो विषयान्पुंस: सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्संजायते काम: कामात्क्रोधोऽभिजायते ।।62।।

  • विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयांत आसक्ती उत्पन्न होते. त्यामुळे ते आपल्याला मिळावेत अशी कामना उत्पन्न होते आणि ती पूर्ण न झाल्यास क्रोध उत्पन्न होतो.

क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम: । 
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ।।63।।

  • क्रोधामुळे संमोह (सारासार विवेक नाहीसा) होतो. संमोहामुळे स्मृती नाहीशी होते. स्मृती नाहीशी झाली की बुद्धीचा नाश होतो. बुद्धीचा नाश झाला असता संपूर्ण ज्ञान नाहीसे होते. परिणामी हा पुरुष आपल्या श्रेयस्थितीपासून अध:पतित होतो.

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ।।64।।

  • परंतु स्वाधीन अंत:करणाचा पुरुष आसक्ती-द्वेषरहित आणि स्ववश केलेल्या इंद्रियांद्वारे विषयांचा उपभोग करीत असूनही अंत:करणाची प्रसन्नता प्राप्त करतो

प्रसादे सर्वदु:खानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धि: पर्यवतिष्ठते ।।65।।

  • अंत:करणाच्या प्रसन्नेतेच्या योगाने त्याच्या सर्व दु:खांचा अंत होतो आणि त्या प्रसन्नचित्त कर्मयोग्याची बुद्धी लवकरच सगळीकडून परावृत्त होऊन एका परमात्म्यातच उत्तमप्रकारे स्थिर होते.

नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयत: शान्तिरशान्तस्य कुत: सुखम् ।।66।।

  • मन व इंद्रिये स्वाधीन नसलेल्या पुरुषाची बुद्धी कधीही स्थिर नसते तसेच त्या अयुक्त पुरुषाच्या अंत:करणात आस्तिक भावही नसतो. त्या भावनाहीन पुरुषाला शांती मिळत नाही, मग तशा शांतिरहित पुरुषाला सुख तरी कसे मिळू शकेल ?

इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ।।67।।

  • ज्याप्रमाणे पाण्यातील नौकेला सोसाट्याचा वारा भरकटत नेतो, त्याचप्रमाणे विषयांमध्ये भरकटणाऱ्या इंद्रियांपैकी ज्या इंद्रियाबरोबर मन राहते, ते एकटेच इंद्रिय त्या अयुक्त पुरुषाच्या बुद्धीचे हरण करते.

तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वश: ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।68।।

  • म्हणून हे महाबाहू ! ज्या पुरुषाची इंद्रिये सर्वप्रकारे इंद्रियांच्या विषयांपासून नियंत्रित केलेली असतात, त्याचीच बुद्धी स्थिर आहे, असे समजावे.

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुने: ।।69।।

  • संपूर्ण प्राणिमात्रांसाठी जे रात्रीसमान आहे, त्या नित्य, ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीसाठी स्थितप्रज्ञ योगी जागत असतो आणि ज्या नाशवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीसाठी सर्व प्राणी जागतात, परमात्म-तत्त्व जाणणाऱ्या मुनीसाठी ते रात्रीसमान आहे.

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमाप: प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ।।70।।

  • ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी परिपूर्ण व अचल असलेल्या समुद्रात अनेक नद्यांचे पाणी त्याला चंचल न करताच प्रवेश करते, त्याप्रमाणे ज्या स्थितप्रज्ञ पुरुषात सर्व विषयभोग कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच प्रवेश करतात, तोच पुरुष परम शांतीस प्राप्त होतो; विषयभोगांची इच्छा करणारा नव्हे.

विहाय कामान्य: सर्वान्पुमांश्चरति नि:स्पृह: ।
निर्ममो निरहंकार: स शान्तिमधिगच्छति ।।71।।

  • जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून, ममतारहित, अहंकाररहित व स्पृहारहित होऊन जगात वावरतो, त्यालाच शांती लाभते.

एषा ब्राह्मी स्थिति: पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ।।72।।

  • हे पार्थ ! ही ब्रह्मप्राप्ती झालेल्या पुरुषाची स्थिती आहे. ही प्राप्त झाली असता योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळीही या निष्ठेत स्थित होऊन ब्रह्मानंदास प्राप्त होतो.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्याय: ।।2।।

अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘सांख्ययोग’ नामक दुसरा अध्याय संपूर्ण झाला.

Free Download भगवत गीता अध्याय 2 मराठी

इतरांना शेयर करा...

थोडक्यात - हेही वाचा

नियमित महत्वाची माहिती हवी आहे ?

Must Read

सर्वाधिक वाचलेले

आमच्याशी जुडा

पोस्ट आपल्या व्हाट्सप्प वर मागविण्यासाठी आम्हाला आपलं नाव, गांव/शहर व जिल्हा मैसेज करा