Bhagavad Gita Chapter 9 in Marathi PDF Download

Bhagavad Gita Chapter 9 in Marathi PDF Download

नववा अध्याय : राजविद्याराजगुह्ययोग [Chapter 9 With meaning in Marathi]

  • सातव्या अध्यायाच्या आरंभी भगवान श्रीकृष्णांनी विज्ञानासह ज्ञानाचे वर्णन करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यानुसार त्या विषयाचे वर्णन करून शेवटी ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव व अधियज्ञासह भगवंताला जाणण्याचे आणि अंतकाळी भगवंताच्या चिंतनाचे वर्णन केले. नंतर आठव्या अध्यायात विषय समजावून सांगण्यासाठी अर्जुनाने सात प्रश्न विचारले. त्यांच्यापैकी सहा प्रश्नांची उत्तरे तर भगवंताने तिसऱ्या व चौथ्या श्लोकात संक्षेपात दिली आहेत परंतु सातव्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी ज्या उपदेशाचा आरंभ केला, त्यातच आठवा अध्याय पूर्ण झाला. अशा प्रकारे सातव्या अध्यायात आरंभिलेल्या विज्ञानासह ज्ञानाचे सांगोपांग वर्णन न होऊ शकल्याने त्याविषयी व्यवस्थित समजाविण्यासाठी ते नवव्या अध्यायाचा आरंभ करतात. सातव्या अध्यायात वर्णिलेल्या उपदेशाशी याचा घनिष्ठ संबंध सांगण्यासाठी पहिल्या श्लोकात पुन्हा त्याच विज्ञानासह ज्ञानाचे वर्णन करण्याची प्रतिज्ञा करतात.

।। अथ नवमोऽध्याय: ।।

  • श्रीभगवानुवाच :

इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ।।1।।

  • श्रीभगवान म्हणाले : हे अर्जुन ! तुझ्यासारख्या दोषदृष्टिरहित भक्तासाठी मी या अत्यंत गोपनीय ज्ञानाचे रहस्योद्घाटन करतो, जे जाणून घेतल्यावर तू दु:खरूप भवबंधनातून मुक्त होशील.

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ।।2।।

  • हे विज्ञानसहित ज्ञान सर्व विद्यांचा आणि सर्व गूढ गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र, अति उत्तम, प्रत्यक्ष फळ (आत्मज्ञान) देणारे, धर्मयुक्त, आचरण करण्यास अत्यंत सोपे व अविनाशी आहे.

अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परंतप ।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ।।3।।

  • हे परंतप ! या तत्त्वज्ञानरूप धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्यूरूप भवचक्रातच भ्रमण करीत असतात.

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित: ।।4।।

  • मज अव्यक्तस्वरूप सच्चिदानंदघन परमात्म्याद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे आणि सर्व जीव माझ्या ठायी संकल्पाच्या आधाराने स्थित आहेत, परंतु वास्तविक मी त्यांच्यामध्ये स्थित नाही.

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ।
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावन: ।।5।।

  • ते सर्व जीव माझ्यात स्थित नाहीत परंतु माझी ईश्वरीय योगमाया आणि माझा प्रभाव तर पहा की सर्व जीवांचे धारण व पोषण करणारा आणि सर्व जीवांना उत्पन्न करणारा माझा आत्मा वास्तविकपणे त्या जीवांमध्ये स्थित नाही.

यथाकाशस्थितो नित्यं वायु: सर्वत्रगो महान् ।
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ।।6।।

  • जसे आकाशापासून उत्पन्न झालेला व सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशातच स्थित असतो, तसेच माझ्या संकल्पाद्वारे उत्पन्न झाल्याने सर्व जीव माझ्यातच स्थित आहेत, असे जाण.

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् ।
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ।।7।।

  • हे कौंतेय ! कल्पाच्या अंती सर्व जीव माझ्या प्रकृतीला प्राप्त होतात अर्थात् प्रकृतीत लय पावतात आणि नवीन कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मीच त्यांना पुन्हा उत्पन्न करतो.

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुन: पुन: ।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ।।8।।

  • मी आपल्या त्रिगुणात्मक मायेचा अंगीकार करून स्वभावाने वशीभूत होऊन परतंत्र झालेल्या या संपूर्ण प्राणिसमुदायाला त्यांच्या कर्मांनुसार पुन:पुन्हा उत्पन्न करतो.

न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय ।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ।।9।।

  • हे धनंजय ! त्या कर्मांमध्ये आसक्तिरहित व उदासीनाप्रमाणे राहणाऱ्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक ठरत नाहीत.

मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम् ।
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ।।10।।

  • हे अर्जुन ! मज अधिष्ठात्याच्या सान्निध्याने ही प्रकृती अर्थात् माझी माया चराचर (चर व अचर) जगाची उत्पत्ती करते आणि या कारणानेच हे संसारचक्र फिरत आहे.

अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ।।11।।

  • माझा परम भाव न जाणणारे अज्ञानी लोक मनुष्यदेह धारण करणाऱ्या मज सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात अर्थात् आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरूपाने व्यवहार करणाऱ्या मज परमेश्वराला साधारण मनुष्य मानतात.

मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतस: ।
राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता: ।।12।।

  • ज्यांच्या आशा व्यर्थ, ज्यांची कर्मे व्यर्थ व ज्यांचे सर्व ज्ञान व्यर्थ असते, अशा अस्थिर चित्ताच्या अज्ञानी लोकांनी राक्षसी, आसुरी व मोहिनी प्रकृतीला धारण केलेले असते.

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता: ।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ।।13।।

  • परंतु हे पार्थ ! दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले जे महात्मे आहेत, ते मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी, अक्षरस्वरूप जाणून अनन्य मनाने युक्त होऊन निरंतर भजतात.

सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता: ।
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ।।14।।

  • ते दृढनिश्चयी भक्तजन नेहमी माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. ते मला वारंवार नमस्कार करीत सदैव माझ्या ध्यानात तन्मय होऊन अनन्य भक्तीने माझी उपासना करतात.

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ।।15।।

  • काही ज्ञानयोगी मज निर्गुण-निराकार ब्रह्मची ज्ञानयज्ञाद्वारे अभिन्न भावाने पूजा करूनही माझी उपासना करतात आणि दुसरे मनुष्य नाना प्रकारांनी स्थित मज विराटस्वरूप परमेश्वराची पृथक् भावाने उपासना करतात.

अहं क्रतुरहं यज्ञ: स्वधाहमहमौषधम् ।
मंत्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ।।16।।

  • श्रौतकर्म मी आहे, यज्ञ मी आहे, स्वधा अर्थात पितरांच्या निमित्ताने दिले जाणारे अन्न मी आहे, औषधी अर्थात् सर्व वनस्पती मी आहे, मंत्र मी आहे, तूप मी आहे, अग्नी मी आहे आणि हवनरूप क्रियासुद्धा मीच आहे.

पिताहमस्य जगतो माता धाता पितामह: ।
वेद्यं पवित्रमोंकार ॠक्साम यजुरेव च ।।17।।

  • मीच या संपूर्ण जगाचा धारण-पोषणकर्ता व कर्मांचे फळ देणारा तसेच पिता, माता व पितामह आहे. मीच जाणण्यायोग्य, पवित्र ओमकार तसेच ॠग्वेद, सामवेद व यजुर्वेदही मीच आहे.

गतिर्भर्ता प्रभु: साक्षी निवास: शरणं सुहृत् ।
प्रभव: प्रलय: स्थानं निधानं बीजमव्ययम् ।।18।।

  • मीच प्राप्त होण्यायोग्य परम धाम, सर्वांचा भरण-पोषणकर्ता व स्वामी, शुभ-अशुभांना पाहणारा साक्षी, सर्वांचे निवासस्थान, शरण घेण्यास योग्य, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा मित्र आहे. सर्वांच्या उत्पत्ती-प्रलयाचा कारण, स्थितीचा आधार, निधान (प्रलयकाळी सर्व जीव सूक्ष्मरूपाने ज्यात लय पावतात तो) आणि अविनाशी कारण अर्थात् बीजसुद्धा मीच आहे.

तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ।।19।।

  • मीच सूर्यरूप बनून तापतो आणि पाणी शोषून घेतो. नंतर मीच इंद्ररूपाने त्याचा वर्षाव करतो. हे अर्जुन ! मीच अमृत आणि मृत्यू आहे तसेच सत् व असत् सुद्धा मीच आहे.

त्रैविद्या मां सोमपा: पूतपापा
यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम्-
अश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ।।20।।

  • तिन्ही वेदांमध्ये सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरसाचे पान करणारे, पापांपासून शुद्ध झालेले पुरुष यज्ञांद्वारे अप्रत्यक्षपणे माझीच पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. ते आपल्या पुण्यांच्या फळरूपात स्वर्गात जातात आणि तेथे देवांचे दिव्य भोग भोगतात.

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ।।21।।

  • स्वर्गातील अमर्याद विषयसुखाचा उपभोग घेऊन पुण्य क्षीण झाल्यावर ते पुन्हा मृत्युलोकाला प्राप्त होतात. याप्रमाणे स्वर्गाचे साधनरूप असलेल्या तिन्ही वेदांमध्ये सांगितलेल्या सकाम कर्मांचे आचरण करणारे आणि भोगांची कामना करणारे पुरुष वारंवार जन्म-मृत्यूच्या चक्रात पडतात; अर्थात् पुण्याच्या प्रभावाने स्वर्गात जातात आणि पुण्य क्षीण होताच मृत्युलोकी येतात.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।।22।।

  • जे अनन्य प्रेमी भक्तजन मज परमेश्वराचे निरंतर चिंतन करीत निष्कामभावाने मला भजतात, त्या नित्य ऐक्यभावाने माझ्या ठायी स्थित झालेल्या पुरुषांचा योगक्षेम मी स्वत: वाहतो (चालवितो).

येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता: ।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ।।23।।

  • हे कौंतेय ! जरी श्रद्धेने युक्त होऊन सकाम भक्त दुसऱ्या देवतांची पूजा करतात, तरी तेसुद्धा माझीच पूजा करतात. परंतु त्यांची ती उपासना अविधिपूर्वक अर्थात् अज्ञानयुक्त आहे.

अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।
न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ।।24।।

  • कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामीसुद्धा मीच आहे. परंतु ते मज अधियज्ञस्वरूप परमेश्वराला तत्त्वत: जाणत नाहीत म्हणून च्युत होतात अर्थात् पुनर्जन्म पावतात.

यान्ति देवव्रता देवान्पितृृन्यान्ति पितृव्रता: ।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्तिमद्याजिनोऽपि माम् ।।25।।

  • देवतांची पूजा करणारे मृत्यूनंतर देवांना प्राप्त होतात. पितरांची पूजा करणारे पितरांकडे जातात. भूतप्रेतांची उपासना करणारे भूतयोनीत जातात आणि माझी पूजा करणारे भक्त मलाच प्राप्त होतात. म्हणून माझ्या भक्तांचा पुनर्जन्म होत नाही.

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मन: ।।26।।

  • जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, जल वगैरे अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताचे प्रेमपूर्वक अर्पण केलेले ते पत्रपुष्पादिक मी सगुणरूपाने प्रगट होऊन मोठ्या प्रेमाने ग्रहण करतो.

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ।।27।।

  • हे कौंतेय ! तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे यज्ञ करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मलाच अर्पण कर.

शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनै: ।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ।।28।।

  • असे केले असता शुभाशुभ फळ देणाऱ्या कर्मबंधनातून तू मुक्त होशील. ही कर्तृत्व व भोक्तृत्व यांच्या संन्यासाची सोपी युक्ती (संन्यासयोग) तुला सांगितली आहे. या युक्तीने तू कर्मबंधनातून सुटून अनायास मलाच प्राप्त होशील.

समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय: ।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ।।29।।

  • मी सर्व भूतांच्या ठायी समभावाने व्यापक आहे. मला कोणीही अप्रिय अथवा प्रिय नाही; परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात आहेत आणि मीसुद्धा त्यांच्यात प्रत्यक्ष प्रगट आहे.

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्य: सम्यग्व्यवसितो हि स: ।।30।।

  • जर एखादा अतिशय दुराचारीसुद्धा अनन्यभावाने माझा भक्त बनून मला भजत असेल तर तो साधूच समजला पाहिजे. कारण तो यथार्थ निश्चयी पुरुष आहे अर्थात् त्याने असा दृढ निश्चय केलेला असतो की परमेश्वराच्या भजनासमान दुसरे काहीही नाही.

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति । 
कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्त: प्रणश्यति ।।31।।

  • तो लवकरच धर्मात्मा (सदाचारी) बनतो आणि त्याला शाश्वत परम शांती लाभते. हे कौंतेय ! तू निश्चयपूर्वक हे सत्य जाणून घे की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही.

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनय: ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ।।32।।

  • हे पार्थ ! जे माझा आश्रय घेतात, ज्यांचा माझ्या ठायी सर्वस्वी दृढ भाव आहे, मग ते जरी पापयोनीत जन्मलेले असले अथवा स्त्री, वैश्य, शूद्र असले तरी परमगतीस अर्थात् मलाच प्राप्त होतात.

किं पुनर्ब्राह्मणा: पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ।।33।।

  • तर मग यात काय सांगावयाचे की पुण्यशील ब्राह्मण व राजर्षी भक्तजन मला शरण येऊन परम गतीस प्राप्त होतात. म्हणून तू सुखरहित व क्षणभंगुर अशा या मनुष्य शरीराला प्राप्त झाला असल्याने निरंतर माझेच भजन कर.

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण: ।।34।।

  • सदैव माझे स्मरण कर, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. अशा रितीने आत्म्याला माझ्यात स्थित करून, मत्परायण होऊन तू मलाच प्राप्त होशील.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्याय: ।।9।।

अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘राजविद्याराजगुह्ययोग’ नामक नववा अध्याय संपूर्ण झाला.

Free Download भगवत गीता अध्याय 9 मराठी

Bhagavad Gita Chapter 8 in Marathi PDF Download

Bhagavad Gita Chapter 8 in Marathi PDF Download

आठवा अध्याय : अक्षरब्रह्मयोग [Chapter 8 With meaning in Marathi]

  • सातव्या अध्यायाच्या पहिल्या ते तिसऱ्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सत्यस्वरूपाचे तत्त्व ऐकण्यासाठी सावध करून ते सांगण्याची प्रतिज्ञा केली. नंतर ते जाणणाऱ्यांची प्रशंसा करून 27व्या श्लोकापर्यंत ते तत्त्व नाना प्रकारे समजाविले आणि अखेरिस ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांच्यासह भगवंताचे समग्र स्वरूप जाणणाèया भक्तांचा महिमा सांगून तो अध्याय समाप्त केला. परंतु ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ या सहा गोष्टींचे व मरणकाळी भगवंताला जाणण्याचे रहस्य समजले नाही, म्हणून अर्जुन विचारतो.

।। अथाष्टमोऽध्याय: ।।

  • अर्जुन उवाच :

किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ।।1।।

  • अर्जुन म्हणाला : हे पुरुषोत्तम ! ज्याचे तुम्ही वर्णन केले ते ब्रह्म काय आहे ? अध्यात्म काय आहे ? कर्म काय आहे ? अधिभूत नावाने काय सांगितले जाते आणि अधिदैव कशाला म्हणतात ?

अधियज्ञ: कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभि: ।।2।।

  • हे मधुसूदन ! येथे अधियज्ञ कोण आहे आणि या देहात तो कसा निवास करतो ? युक्तचित्ताचा पुरुष अंतकाळी तुम्हाला कसे जाणू शकतो ?
  • श्रीभगवानुवाच :

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित: ।।3।।

  • श्रीभगवान म्हणाले : परम अक्षर अर्थात् ज्याचा कधीच नाश होत नाही असा सच्चिदानंदघन परमात्मा ‘ब्रह्म’ आहे आणि त्याची जी सहज स्वरूपस्थिती आहे तिला ‘अध्यात्म’ असे म्हणतात. प्राणिमात्रांच्या भावांना उत्पन्न करणारा जो शास्त्रविहित त्याग आहे, त्याला ‘कर्म’ असे नाव आहे.

अधिभूतं क्षरो भाव: पुरुषश्चाधिदैवतम् ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ।।4।।

  • उत्पत्ती व विनाशशील धर्माचे सर्व पदार्थ ‘अधिभूत’ आहेत. ज्याला जीव या नावाने संबोधतात, तो या पंचभूतात्मक देहातील ‘अधिदैव’ समजावा आणि हे नरश्रेष्ठ ! या देहात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने ‘अधियज्ञ’ आहे.

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशय: ।।5।।

  • जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीर सोडतो, तो माझ्याच स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही.

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावित: ।।6।।

  • हे कौंतेय ! अंतकाळी मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीर सोडतो, त्या त्या भावालाच तो प्राप्त होतो. कारण मनुष्य सदैव ज्या भावाचे (अर्थात् गोष्टीचे) चिंतन करीत असतो, अंतकाळीही बहुधा त्याचेच स्मरण त्याला होत असते.

तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ।।7।।

  • म्हणून हे अर्जुन ! तू नेहमी माझेच स्मरण कर आणि युद्धरूपी स्वधर्मदेखील कर. तू आपली मन-बुद्धी माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर नि:संदेह मलाच प्राप्त होशील.

अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ।।8।।

  • हे पार्थ ! हा नियम आहे की भगवद्ध्यानाच्या अभ्यासरूप योगाने युक्त, दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर माझे चिंतन करणारा पुरुष परम प्रकाशस्वरूप दिव्य पुरुषाला अर्थात् मज परमेश्वरालाच प्राप्त होतो.

कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्य: ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमस: परस्तात् ।।9।।
प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रूवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ।।10।।

  • जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियंता, सूक्ष्माहूनही अति सूक्ष्म, सर्वांचे धारण-पोषण करणारा, अचिंत्यस्वरूप, सूर्याप्रमाणे नित्य चेतन प्रकाशरूप, अविद्येच्या अगदी पलीकडील अशा शुद्ध परब्रह्म परमात्म्याचे स्मरण करीत असतो; तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळीदेखील योगबळाने भृकुटीच्या मध्यभागी प्राणाला चांगल्या रितीने स्थापन करून निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्यस्वरूप परम पुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो.

यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा: ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ।।11।।

  • वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंदघनरूप परम पदाला अक्षर (अविनाशी) म्हणतात, आसक्तिरहित प्रयत्नशील संन्यासी महात्मा ज्यात प्रवेश करतात आणि ज्या परम पदाचे इच्छुक ब्रह्मचर्याचे आचरण करतात, त्या परम पदाविषयी आता तुला थोडक्यात सांगतो.

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मन: प्राणमास्थितो योगधारणाम् ।।12।।
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
य: प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ।।13।।

  • सर्व इंद्रियांच्या द्वारांना संयमित करून व मनाला हृदयात स्थिर करून, मग त्या जिंकलेल्या मनाद्वारे प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मसंबंधी योगधारणेत स्थित होऊन जो पुरुष ‘ॐ’ या एक अक्षररूप ब्रह्मचे उच्चारण करीत आणि त्याच्या अर्थस्वरूप मज निर्गुण ब्रह्मचे चिंतन करीत देहाचा त्याग करतो, तो पुरुष परम गतीस प्राप्त होतो.

अनन्यचेता: सततं यो मां स्मरति नित्यश: ।
तस्याहं सुलभ: पार्थ नित्ययुक्तस्य योगिन: ।।14।।

  • हे पार्थ ! जो माझ्या ठायी अनन्य चित्ताने स्थित होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे अखंड स्मरण करतो, त्या नित्य-निरंतर माझ्याशी एकरूप झालेल्या योग्याला मी सुलभ आहे अर्थात् त्याला मी सहजच प्राप्त होतो.

मामुपेत्य पुनर्जन्म दु:खालयमशाश्वतम् ।
नाप्नुवन्ति महात्मान: संसिद्धिं परमां गता: ।।15।।

  • परम सिद्धी पावलेल्या महात्म्यांना माझी प्राप्ती झाल्यावर दु:खांचे माहेरघर असलेले विनाशी शरीर पुन्हा प्राप्त होत नाही.

आब्रह्मभुवनाल्लोका: पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ।।16।।

  • हे अर्जुन ! ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत अर्थात् त्यांची प्राप्ती झाली तरी पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत. परंतु हे कौंतेय ! मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही. कारण मी कालातीत आहे आणि हे ब्रह्मादिकांचे सर्व लोक काळाद्वारे सीमित असल्याने अनित्य आहेत.

सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदु: ।
रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जना: ।।17।।

  • ब्रह्मदेवाचा जो एक दिवस आहे, तो एक हजार चतुर्युगांचा कालावधी आहे आणि रात्रदेखील एक हजार चतुर्युगांच्या कालावधीची असते. याला जे पुरुष तत्त्वत: जाणतात, ते योगिजन काळाचे तत्त्व जाणणारे आहेत.

अव्यक्ताद्व्यक्तय: सर्वा: प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ।।18।।

  • आसर्व चराचर भूतसमुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ होताच अव्यक्तातून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतो आणि ब्रह्मदेवाची रात्र सुरू होताच पुन्हा अव्यक्त नामक ब्रह्मदेवाच्या शरीरातच लीन होतो.

भूतग्राम: स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमेऽवश: पार्थ प्रभवत्यहरागमे ।।19।।

  • हे पार्थ ! तोच हा भूतसमुदाय (जीव) उत्पन्न होऊन प्रकृतिवश असल्यामुळे रात्रीच्या सुरुवातीला लय पावतो आणि दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो.

परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातन: ।
य: स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ।।20।।

  • परंतु त्या अव्यक्ताहून अति पलीकडचा दुसरा अर्थात् विलक्षण असा जो सनातन अव्यक्त भाव आहे, तो परम दिव्य पुरुष सर्व भूतांचा नाश झाला तरी नष्ट होत नाही.

अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहु: परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ।।21।।

  • जो अव्यक्त ‘अक्षर’ या नावाने संबोधला जातो, त्याच अक्षर नावाच्या अव्यक्त भावाला परम गती म्हणतात तसेच ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाले असता जीवाचा पुनर्जन्म होत नाही, तेच माझे परम धाम होय.

पुरुष: स पर: पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।
यस्यान्त:स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ।।22।।

  • हे पार्थ ! ज्या परमात्म्यात सर्व भूतसमुदाय वास्तव्य करतो आणि ज्या सच्चिदानंदघन परमात्म्याने हे सर्व जग परिपूर्ण आहे, तो सनातन अव्यक्त परम पुरुष तर अनन्य भक्तीनेच प्राप्त होतो.

यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिन: ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ।।23।।

  • हे भरतश्रेष्ठ ! ज्या काळात शरीराचा त्याग करून गेलेले योगिजन परत न येणाऱ्या गतीला तसेच ज्या काळात गेलेले परत येणाऱ्या गतीला प्राप्त होतात, ते दोन्ही काळ अर्थात् दोन्ही मार्ग मी तुला सांगतो.
अग्निर्ज्योतिरह: शुक्ल: षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना: ।।24।।
  • ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीचा अधिपती देव आहे, दिवसाचा अधिपती देव आहे तसेच शुक्लपक्षाचा अधिपती देव आहे आणि उत्तरायणच्या सहा महिन्यांचा अधिपती देव आहे, त्या मार्गांत मृत्यू होऊन गेलेले ब्रह्मवेत्ते योगिजन वरील देवांद्वारे क्रमाने नेले जाऊन ब्रह्मला प्राप्त होतात.

धूमो रात्रिस्तथा कृष्ण: षण्मासा दक्षिणायनम् ।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ।।25।।

  • ज्या मार्गात धूम्राचा अधिपती देव आहे, रात्रीचा अधिपती देव आहे तसेच कृष्णपक्षाचा अधिपती देव आहे आणि दक्षिणायनच्या सहा महिन्यांचा अधिपती देव आहे, त्या मार्गांत मृत्यू होऊन गेलेले सकाम कर्मयोगी वरील देवांद्वारे क्रमाने नेले जाऊन चंद्रज्योतीस प्राप्त होतात आणि स्वर्गात आपल्या शुभकर्मांचे फळ भोगून परत इहलोकी येतात.

शुक्लकृष्णे गती ह्येते जगत: शाश्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुन: ।।26।।

  • जगातील हे दोन प्रकारचे – शुक्ल व कृष्ण अर्थात् देवयान व पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. त्यांपैकी एका मार्गाने गेलेला – ज्यामुळे परत यावे लागत नाही, त्या परम गतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो अर्थात् जन्म-मृत्यूला प्राप्त होतो.

नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ।।27।।

  • हे पार्थ ! याप्रमाणे या दोन्ही मार्गांना तत्त्वत: जाणले असता कोणताही योगी मोहित होत नाही. म्हणून हे अर्जुन ! तू सर्वकाळी समत्वबुद्धिरूप योगाने युक्त हो अर्थात् निरंतर माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो.

वेदेषु यज्ञेषु तप:सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।
अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ।।28।।

  • योगी पुरुष या रहस्याला तत्त्वत: जाणून वेदाध्ययन, होम-हवन, तपश्चर्या, दानधर्म यांचे जे पुण्यफळ शास्त्रांनी सांगितले आहे, त्या सर्वांचे नि:संशय उल्लंघन करून जातो आणि सनातन परम पदास प्राप्त होतो.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्याय: ।।1।।

अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘अक्षरब्रह्मयोग’ नामक आठवा अध्याय संपूर्ण झाला.

Free Download भगवत गीता अध्याय 8 मराठी

Bhagavad Gita Chapter 7 in Marathi PDF Download

Bhagavad Gita Chapter 7 in Marathi PDF Download

Play Audio [Gita Chapter 7 Marathi Mp3]

सातवा अध्याय : ज्ञानविज्ञानयोग [Chapter 7 With meaning in Marathi]

  • सहाव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात : ‘मत्परायण होऊन जो श्रद्धा व प्रीतिपूर्वक मला भजतो, तो सर्व योग्यांहून उत्तम योगी आहे.’ परंतु जोपर्यंत मनुष्याला भगवंताचे स्वरूप, गुण व प्रभाव समजत नाही तोपर्यंत त्याच्याद्वारे अंत:करणपूर्वक सतत भजन होणे कठीण आहे. म्हणूनच भगवंत या सातव्या अध्यायात आपल्या गुण-प्रभावासह संपूर्ण स्वरूपाचे व नाना प्रकारच्या भक्तियोगाचे वर्णन करतात. त्यात प्रथम ते एकाग्र चित्ताने ऐकण्याची प्रेरणा देऊन ज्ञानविज्ञान सांगण्याचे वचन देतात.

।। अथ सप्तमोऽध्याय: ।।

  • श्रीभगवानुवाच :

मय्यासक्तमना: पार्थ योगं युंजन्मदाश्रय: ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ।।1।।

  • श्रीभगवान म्हणाले : हे पार्थ ! अनन्य प्रेमाने माझ्या ठायी मन लावून आणि अनन्य भावाने मत्परायण होऊन योगसाधन करीत असता सर्व विभूती, बल, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त व सर्वांचा आत्मरूप अशा मला तू नि:संशयपणे पूर्णत: कसा जाणू शकशील, ते ऐक.

ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषत: ।
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ।।2।।

  • मी तुला हे रहस्यमय तत्त्वज्ञान पूर्णपणे सांगतो, जे जाणल्यानंतर या जगात पुन्हा दुसरे काही जाणायचे शिल्लक राहत नाही.

मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत: ।।3।।

  • हजारो मनुष्यांमध्ये एखादाच माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नशील योग्यांपैकीही एखादाच मत्परायण होऊन मला तत्त्वत: अर्थात् यथार्थरूपाने जाणतो.

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ।।4।।
अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ।।5।।

  • भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार अशा आठ प्रकारांमध्ये माझी प्रकृती विभागलेली आहे. ही आठ प्रकारचे भेद असणारी ‘अपरा’ अर्थात् माझी जड प्रकृती आहे आणि हे महाबाहू ! हिच्याहून दुसरी, जिने हे संपूर्ण जग धारण केले आहे, तिला माझी जीवरूप ‘परा’ अर्थात् चेतन प्रकृती जाण.

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
अहं कृत्स्नस्य जगत: प्रभवः प्रलयस्तथा ।।6।।

  • हे अर्जुन ! तू असे समज की सर्व भूतांची उत्पत्ती या दोन्ही प्रकृतींपासूनच होते आणि मी या सर्व जगाचा उत्पत्तिरूप व प्रलयरूप आहे अर्थात् मी सर्व जगाचे मूळ कारण आहे.

मत्त: परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय ।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ।।7।।

  • हे धनंजय ! माझ्याशिवाय किंचितमात्रही दुसरे काही नाही. दोऱ्यात दोऱ्याचे मणी ओवावेत त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्या ठायी ओवलेले आहे अर्थात् सर्वकाही माझ्याच आश्रित आहे.

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो: ।
प्रणवः सर्ववेदेषु शब्द: खे पौरुषं नृषु ।।8।।

  • हे कौंतेय ! पाण्यात रस मी आहे, चंद्र व सूर्यात प्रकाश मी आहे, सर्व वेदांमध्ये ओम्कार (ॐ) मी आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषांमधील पुरुषत्व मी आहे.

पुण्यो गन्ध: पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ।।9।।

  • पृथ्वीचा नैसर्गिक पवित्र सुगंध मी आहे, अग्नीचे तेज मी आहे, सर्व जीवांचे जीवन मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे.

बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।।10।।

  • हे पार्थ ! सर्व भूतांचे सनातन कारण (बीज) मलाच जाण. सर्व बुद्धिवंतांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज मी आहे.

बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् ।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ।।11।।

  • हे भरतश्रेष्ठ ! बलवानांचे कामना व आसक्ती यांनी रहित बळ मी आहे तसेच सर्व प्राणिमात्रांमध्ये धर्मानुकूल अर्थात् शास्त्रानुकूल (व प्राणिमात्रांच्या उत्पत्तीस कारण असलेला) काम मी आहे.

ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये ।
मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ।।12।।

  • आणखीही जे सत्त्वगुणापासून उत्पन्न होणारे भाव आहेत आणि जे रजोगुणापासून व तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव आहेत, त्या सर्वांना तू ‘माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत’, असे जाण. परंतु वास्तविक त्यांच्यामध्ये मी आणि ते माझ्यात नाहीत.

त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभि: सर्वमिदं जगत् ।
मोहितं नाभिजानाति मामेभ्य: परमव्ययम् ।।13।।

  • गुणांचे कार्यरूप सात्त्विक, राजस व तामस – या तीन प्रकारच्या भावांनी हे सर्व जग मोहित होत आहे, म्हणून या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या मज अविनाशीला जाणत नाही.

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ।।14।।

  • कारण ही अलौकिक अर्थात् अति अद्भुत त्रिगुणमयी माझी माया मोठी दुस्तर (पार करण्यास कठीण) आहे. परंतु जे पुरुष मलाच निरंतर भजतात, ते या मायेचे उल्लंघन करून जातात अर्थात् भवसागरातून तरून जातात.

न मां दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमा: ।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिता: ।।15।।

  • मायेने ग्रासल्यामुळे ज्यांचे ज्ञान हरपले आहे, असे आसुरी स्वभावाला धारण केलेले, मनुष्यांमध्ये नीच (नराधम) आणि दुष्कर्म करणारे मूढ लोक मला भजत नाहीत (माझी उपासना करीत नाहीत).

चतुर्विधा भजन्ते मां जना: सुकृतिनोऽर्जुन ।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ।।16।।

  • हे भरतश्रेष्ठ ! आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे पुण्यशील भक्तजन मला भजतात. (आर्त हा आपले दु:ख दूर करण्यासाठी, अर्थार्थी धनप्राप्तीसाठी आणि जिज्ञासू माझे ज्ञान होण्यासाठी माझी भक्ती करतो.)

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रिय: ।।17।।

  • त्यांच्यापैकी ज्ञानी भक्त नित्य माझ्या ठायी ऐक्यभावाने स्थित (मद्रूप) झालेला असतो तरीही माझी अनन्य भक्ती करतो, म्हणून तो श्रेष्ठ भक्त होय. कारण मला तत्त्वत: जाणणाऱ्या ज्ञानीला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे.

उदारा: सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।
आस्थित: स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ।।18।।

  • नि:संशय हे सर्व भक्त मला श्रद्धेने भजणारे असल्याने उत्तम आहेत, परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे, असे माझे मत आहे. कारण तो मत्परायण मन-बुद्धीचा ज्ञानी भक्त अति उत्तम गतिस्वरूप अशा माझ्या ठायीच चांगल्या प्रकारे स्थित असतो.

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ: ।।19।।

  • अनेक जन्मांच्या शेवटच्या जन्मी तत्त्वज्ञान प्राप्त झालेला जो पुरुष ‘सर्वकाही वासुदेवच आहे’ – अशा प्रकारे मला भजत असतो, तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे.

कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना: प्रपद्यन्तेऽन्यदेवता: ।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता: स्वया ।।20।।

  • नाना भोगांच्या कामनेने ज्यांचे ज्ञान हरपले आहे, ते लोक आपल्या स्वभावाने प्रेरित होऊन त्या त्या नियमांना धारण करून इतर देवतांना भजतात (अर्थात् ज्या देवतेच्या पूजेसाठी जो जो नियम लोकांमध्ये प्रसिद्ध आहे, त्यानुसार त्यांची पूजा करतात).

यो यो यां यां तनुं भक्त: श्रद्धयार्चितुमिच्छति ।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ।।21।।

  • जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवतेच्या स्वरूपाला श्रद्धेने पूजण्याची इच्छा करतो, त्या त्या भक्ताची श्रद्धा मी त्याच देवतेप्रती स्थिर करतो.

स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।
लभते च तत: कामान्मयैव विहितान्हि तान् ।।22।।

  • तो भक्त त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची पूजा करतो आणि त्या देवतेपासून माझ्याकडूनच दिल्या गेलेल्या त्या इच्छित भोगांना नि:संशय प्राप्त करतो.

अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ।।23।।

  • परंतु त्या अल्पबुद्धी पुरुषांचे ते फळ नाशवंत आहे तसेच देवतांची पूजा करणारे देवांना प्राप्त होतात आणि माझ्या भक्तांनी मला कसेही भजले तरी शेवटी ते मलाच प्राप्त होतात.

अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धय: ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ।।24।।

  • मूढ लोक माझे सर्वश्रेष्ठ असे अविनाशी परम स्वरूप न जाणता मन-इंद्रियांच्याही पलीकडील मज सच्चिदानंद परमात्म्याला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन व्यक्तिभावाला प्राप्त झालेला मानतात.

नाहं प्रकाश: सर्वस्य योगमायासमावृत: ।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ।।25।।

  • आपल्या योगमायेचे आवरण घेतल्यामुळे मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणून हा अज्ञानी मनुष्य मज जन्मरहित व अविनाशी परमेश्वराला जाणत नाही अर्थात् मला जन्मणारा व मरणारा समजतो.

वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ।।26।।

  • हे अर्जुन ! पूर्वी होऊन गेलेल्या, आता असलेल्या आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राणिमात्रांना मी जाणतो, परंतु मला कोणीही श्रद्धा-भक्तिरहित पुरुष जाणत नाही.

इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ।।27।।

  • हे परंतप ! हे भारत ! या सृष्टीत इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उत्पन्न झालेल्या सुख-दु:खादी द्वंद्वरूप मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञतेला प्राप्त होत असतात.

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता: ।।28।।

  • परंतु निष्कामभावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे, ते आसक्ती-द्वेषजन्य द्वंद्वरूप मोहातून पूर्णपणे मुक्त झालेले दृढनिश्चयी भक्त मलाच सर्वप्रकारे भजतात.

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।
ते ब्रह्म तद्विदु: कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ।।29।।

  • जे मला शरण येऊन जरा-मरणापासून सुटण्यासाठी प्रयत्न करतात ते पुरुष त्या ब्रह्मला, संपूर्ण अध्यात्माला, सर्व कर्मांना जाणतात.

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदु: ।
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतस: ।।30।।

  • जे पुरुष अधिभूत व अधिदैव यांच्यासह तसेच अधियज्ञासह सर्वांचे आत्मरूप अशा मला अंतकाळीदेखील जाणतात, ते युक्तचित्त (माझ्या ठायी चित्त स्थिर झालेले) पुरुष मला जाणतात अर्थात् मलाच प्राप्त होतात.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्याय: ।।

अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘ज्ञानविज्ञानयोग’ नामक सातवा अध्याय संपूर्ण झाला.

Free Download भगवत गीता अध्याय 7 मराठी​

Shrimad Bhagvad Geeta - Chapter 7

Bhagavad Gita Chapter 5 in Marathi PDF Download

Bhagavad Gita Chapter 5 in Marathi PDF Download

पाचवा अध्याय : कर्मसंन्यासयोग

  • तिसऱ्या व चौथ्या अध्यायात अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांच्या श्रीमुखातून कर्माची विविध प्रकारे प्रशंसा ऐकून व त्यानुसार कर्म करण्याची प्रेरणा आणि आज्ञा घेऊन हेदेखील जाणून घेतले की कर्मयोगाद्वारे भगवद्स्वरूपाचे तत्त्वज्ञान आपोआपच होते. चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवंताने अर्जुनाला कर्मयोग करण्याची आज्ञा दिली, परंतु अधूनमधून ‘ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुन्हति ।’ ‘तद्विद्धि प्रणिपातेन…’ इ. वचनांद्वारे ज्ञानयोगाची (कर्मसंन्यासाची) प्रशंसा केली. यामुळे अर्जुन या दोहोंपैकी कोणते साधन आपल्यासाठी श्रेष्ठ आहे, हे ठरवू शकला नाही. म्हणून याचे उत्तर भगवंताच्या श्रीमुखातूनच ऐकायला मिळावे, या हेतूने अर्जुन विचारतो.

।। अथ पंचमोऽध्याय: ।।

  • अर्जुन उवाच :

संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ।।1।।

  • अर्जुन म्हणाला : हे कृष्ण ! मागे तुम्ही कर्मांच्या संन्यासाची आणि आता पुन्हा कर्मयोगाची प्रशंसा करीत आहात. तरी या दोहोंपैकी एकच, जे माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक साधन असेल, तेच मला सांगावे.
  • श्रीभगवानुवाच :

संन्यास: कर्मयोगश्च नि:श्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ।।2।।

  • श्रीभगवान म्हणाले : कर्मसंन्यास व कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याणकारी आहेत. परंतु या दोहोंपैकी कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग हा आचरण करायला सोपा असल्याने श्रेष्ठ आहे.

ज्ञेय: स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति ।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बंधात्प्रमुच्यते ।।3।।

  • हे अर्जुन ! जो कोणाचाही द्वेष करीत नाही आणि कशाचीही आकांक्षा करीत नाही, तो कर्मयोगी सदा संन्यासीच समजणे योग्य आहे, कारण आसक्ती-द्वेषादी द्वंद्वांपासून रहित पुरुष अगदी सुखपूर्वक भवबंधनातून मुक्त होतो.

सांख्ययोगौ पृथग्बाला: प्रवदन्ति न पण्डिता: ।
एकमप्यास्थित:सम्यगुभयोर्विन्दते फलम् ।।4।।

  • मूर्ख लोक संन्यास व कर्मयोग यांना निरनिराळी फळे देणारी मानतात. ज्ञानीजनांना मात्र तसे वाटत नाही. कारण दोहोंपैकी एका मार्गाचेच उत्तम प्रकारे आचरण करणारा पुरुष दोहोंचेही फळस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो.

यत्सांख्यै: प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं सांख्यं च योगं च य: पश्यति स पश्यति ।।5।।

  • सांख्यमार्गाने जाणाऱ्यांना जे परम धाम मिळते, तेच कर्मयोगाच्या मार्गाने जाणाऱ्यांनाही मिळते. म्हणून जो पुरुष ज्ञानयोग व कर्मयोग यांना फळरूपाने एक पाहतो, तोच यथार्थ पाहतो.

संन्यासस्तु महाबाहो दु:खमाप्तुमयोगत: ।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ।।6।।

  • हे महाबाहू ! कर्मयोगाशिवाय होणाऱ्या संन्यासाची अर्थात् मन, इंद्रिये व शरीराद्वारे होणाऱ्या सर्व कर्मांमध्ये कर्तेपणाच्या त्यागाची प्राप्ती होणे कठीण आहे. परंतु भगवद्स्वरूपाचे मनन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याची शीघ्र प्राप्ती करतो.

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रिय: ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ।।7।।

  • ज्याने मन वश केले आहे, जो जितेंद्रिय व शुद्ध अंत:करणाचा आहे तसेच प्राणिमात्रांच्या आत्म्याशी ज्याचा आत्मा एकरूप झाला आहे, असा कर्मयोगी सर्व कर्मे करीत असूनही अलिप्त राहतो.

नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।
पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन् ।।8।।
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ।।9।।

  • तत्त्ववेत्ता सांख्ययोगी पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे, चालणे, झोपणे, श्वासोच्छ्वास करणे, बोलणे, देणे, घेणे, डोळ्यांची उघडझाप करणे – या सर्व क्रिया इतरांप्रमाणेच करीत असला तरी सर्व इंद्रिये आपापल्या विषयांत वावरतात असे समजून ‘मी काहीच करीत नाही’ असे नि:संदेह मानतो.

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति य: ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ।।10।।

  • जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती त्यागून कर्मे करतो, तो पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापापासून अलिप्त राहतो.

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिन: कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ।।11।।

  • कर्मयोगी ममत्वबुद्धिरहित होऊन केवळ शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांद्वारे आसक्ती त्यागून अंत:करणाच्या शुद्धीसाठी कर्मे करतात.

युक्त: कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्त: कामकारेण फले सक्तो निबध्यते ।।12।।

  • कर्मयोगी कर्मफळांचा त्याग करून भगवद्प्राप्तिरूप शांतीला प्राप्त होतो आणि सकाम पुरुष फलाकांक्षेने कर्मफळात आसक्त होऊन बंधनात पडतो.

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ।।13।।

  • ज्याने आपले अंत:करण वश केले आहे, असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष तर कर्म न करता आणि न करविता नऊ द्वारांच्या या शरीररूपी नगरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून (अर्थात् इंद्रियेच आपापल्या विषयांत वर्तत आहेत असे मानून) आनंदपूर्वक सच्चिदानंदघन परमात्मस्वरूपात स्थित होऊन राहतो.

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु: ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ।।14।।

  • परमेश्वर कोणाचा कर्तेपणा आणि कर्म उत्पन्न करीत नाही तसेच कर्माचे फळही कोणाला देत नाही. ही सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांद्वारेच केली जातात.

नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभु: ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तव: ।।15।।

  • सर्वव्यापी परमात्मा कोणाचेही पाप अथवा पुण्य ग्रहण करीत नाही. परंतु अज्ञानाने ज्ञान झाकून टाकले आहे, त्यामुळे सर्व अज्ञानी मनुष्य कर्तेपणाच्या मोहात पडत आहेत.

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ।।16।।

  • परंतु जेव्हा त्यांचे ते अज्ञान परमात्म्याच्या तत्त्वज्ञानाने नाहीसे होते, तेव्हा जसे पूर्वेला उगवलेला सूर्य सर्व वस्तूंना प्रकाशित करतो, तसे ते ज्ञान परमात्म्याच्या स्वरूपाला स्पष्ट दाखवून देते.

तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणा: ।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषा: ।।17।।

  • ज्यांची बुद्धी तद्रूप झाली आहे, ज्यांचे मन तदाकार झाले आहे आणि सच्चिदानंदघन परमात्म्यातच ज्यांची निरंतर ऐक्यभावाने स्थिती आहे, असे तत्परायण पुरुष आत्मज्ञानाने निष्पाप होऊन अपुनरावृत्तीला अर्थात् परम गतीला प्राप्त होतात.

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन: ।।18।।

  • ते ज्ञानीजन विद्या आणि विनयाने संपन्न ब्राह्मण तसेच गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतात.

इहैव तैर्जित: सर्गो येषां साम्ये स्थितं मन: ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिता: ।।19।।

  • ज्यांचे मन समभावात स्थित आहे, त्यांनी या जन्मीच संसाराला जिंकले आहे अर्थात् जन्म-मृत्यूच्या बंधनावर विजय मिळविला आहे. ते ब्रह्मप्रमाणेच निर्दोष आहेत आणि ब्रह्ममध्येच स्थित आहेत.

न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।
स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थित: ।।20।।

  • जो प्रिय वस्तू मिळाल्याने हर्षित होत नाही तसेच अप्रिय वस्तू मिळाल्याने उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धीचा, संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने नित्य स्थित असतो.

बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ।।21।।

  • बाह्य विषयसुखांमध्ये आसक्ती नसलेला पुरुष आपल्या अंत:करणातच भगवद्ध्यानजन्य सात्त्विक सुख मिळवितो. त्यानंतर परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूपी योगात ऐक्यभावाने स्थित झालेला तो पुरुष अक्षय सुखाचा अनुभव करतो.

ये हि संस्पर्शजा भोगा दु:खयोनय एव ते ।
आद्यन्तवन्त: कौन्तेय न तेषु रमते बुध: ।।22।।

  • विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे सर्व भोग विषयी पुरुषांना सुखरूप भासत असले तरी ते नि:संशय दुःखालाच जन्म देणारे आहेत तसेच ते उत्पन्न होऊन नाहीसे होणारे अर्थात् अनित्य आहेत. म्हणून हे कौंतेय ! बुद्धिमान विवेकी पुरुष त्यांच्यात रमत नाही.

शक्नोतीहैव य: सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्त: स सुखी नर: ।।23।।

  • इहलोकी या देहात असतानाच काम-क्रोधापासून उत्पन्न होणारे आवेग ज्याने आपल्या स्वाधीन (वश) केलेले असतात अर्थात् काम-क्रोधाला ज्याने पूर्णपणे जिंकले आहे, तोच योगी आहे आणि तोच या जगात सुखी आहे.

योऽन्त:सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव य: ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ।।24।।

  • जो अंतरात्म्यातच सुखी आणि आत्म्यातच रममाण झाला आहे तसेच ज्याला आत्म्यातच ज्ञानप्रकाश मिळाला आहे, तो परब्रह्म परमात्म्याशी ऐक्य पावलेला योगी शांत ब्रह्मला प्राप्त होतो.

लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषय: क्षीणकल्मषा: ।
छिन्नद्वैधा यतात्मान: सर्वभूतहिते रता: ।।25।।

  • ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहेत, ज्यांचे सर्व संशय ज्ञानाने निवृत्त झाले आहेत, जे सर्व प्राणिमात्रांच्या हितात रत आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलभावाने परमात्म्यात स्थित आहे, ते ब्रह्मवेत्ते पुरुष शांत परब्रह्मला प्राप्त होतात.

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ।।26।।

  • काम-क्रोधापासून अलिप्त, चित्ताला वश केलेल्या व परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार केलेल्या आत्मज्ञानी पुरुषांसाठी सर्वत्र शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण आहे.

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो: ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ।।27।।
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायण: ।
विगतेच्छाभयक्रोधो य: सदा मुक्त एव स: ।।28।।

  • ज्या मोक्षपरायण मुनीने बाह्य विषयांना वैराग्याच्या आश्रयाने बाहेरच ठेवले, दोन्ही भुवयांच्या मध्ये दृष्टी स्थिर केली, प्राण व अपान यांची उजव्या-डाव्या नाकपुड्यांतील ये-जा बंद करून त्यांचे सुषुम्नेत ऐक्य केले आणि इंद्रिये, मन व बुद्धी यांना स्वाधीन केले; त्यामुळे ज्याच्या इच्छा, भय आणि क्रोध नाहीसे झाले, तो या शरीरात असतानाही सदा मुक्तच आहे.

भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ।।29।।

  • हे अर्जुन ! माझा भक्त मला सर्व यज्ञ व तपांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वराचाही ईश्वर तसेच सर्व प्राणिमात्रांचा सुहृद अर्थात् नि:स्वार्थ दयाळू व प्रेमी- असे तत्त्वत: जाणून शांतीस प्राप्त होतो.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम पंचमोऽध्याय: ।।5।।

अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘कर्मसंन्यासयोग’ नामक पाचवा अध्याय संपूर्ण झाला.

Free Download भगवत गीता अध्याय 5 मराठी

Bhagavad Gita Chapter 4 in Marathi PDF Download

Bhagavad Gita Chapter 4 in Marathi PDF Download

चौथा अध्याय : ज्ञानकर्मसंन्यासयोग [Chapter 4 With meaning in Marathi]

  • तिसऱ्या अध्यायाच्या 4 ते 29व्या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अनेक प्रकारच्या नियोजित कर्मांच्या आचरणाची आवश्यकता सांगितली. त्यानंतर 30व्या श्लोकात भक्तिप्रधान कर्मयोगाद्वारे ममता, आसक्ती व कामनांचा पूर्णत: त्याग करून भगवद्प्रीत्यर्थ कर्म करण्याची आज्ञा दिली. 31 ते 35व्या श्लोकांत त्या सिद्धांतानुसार कर्म करणाऱ्यांची प्रशंसा आणि न करणाऱ्यांची निंदा केली. आसक्ती-द्वेषाच्या अधीन न होता स्वधर्मपालनाविषयी 36व्या श्लोकात अर्जुनाने विचारल्यावर 37व्या श्लोकापासून अध्याय समाप्तीपर्यंत काम हाच सर्व अनर्थांचे मूळ कारण असल्याचे सांगण्यात आले आणि बुद्धीद्वारे मन-इंद्रिये वश करून त्याचा नाश करण्याची आज्ञा दिली. परंतु कर्मयोगाचा महिमा अगाध आहे, म्हणून भगवंत पुन्हा त्याबाबत अनेक दृष्टान्त देतात. प्रथम 3 श्लोकांमध्ये कर्मयोगाची परंपरा सांगून त्याची अनादिता सिद्ध करून त्याची प्रशंसा करतात.

।। अथ चतुर्थोऽध्याय: ।।

  • श्रीभगवानुवाच :

इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ।।1।।

  • श्रीभगवान म्हणाले : मी हा अविनाशी योग कल्पाच्या आरंभी सूर्याला सांगितला होता. पुढे सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकू राजाला सांगितला.

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदु: ।
स कालेनेह महता योगो नष्ट: परंतप ।।2।।

  • अशा रितीने परंपरेने प्राप्त झालेला हा योग पुष्कळ राजर्षींनी जाणून घेतला, परंतु हे परंतप ! काळाच्या ओघात परंपरा खंडित झाली आणि या जगात हा योग लोप पावला.

स एवायं मया तेऽद्य योग: प्रोक्त: पुरातन: ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ।।3।।

  • तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस, म्हणून हा प्राचीन योग आज मी तुला सांगितला. कारण हा योग अतिशय उत्तम आणि रहस्यमय अर्थात् मार्मिक विषय आहे.
  • अर्जुन उवाच :

अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वत: ।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ।।4।।

  • अर्जुनाने विचारले : तुमचा जन्म तर हल्लीच झाला आहे आणि सूर्याचा जन्म अतिशय प्राचीन आहे. मग तुम्ही कल्पारंभी सूर्याला या योगाचा उपदेश केला होता, हे मी कसे समजावे ?
  • श्रीभगवानुवाच :

बहूनि में व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ।।5।।

  • श्रीभगवान म्हणाले : हे अर्जुन ! तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत. हे परंतप ! त्या सर्वांना तू जाणत नाहीस, पण मी जाणतो.

अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ।।6।।

  • मी अजन्मा, अविनाशी आणि सर्व भूतप्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीचा आश्रय घेऊन स्वतःच्या योगमायेने साकार रूपात प्रगट होत असतो.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।7।।

  • जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा हे भारत ! मी स्वत:ला सगुण-साकार रूपात लोकांसमोर प्रगट करतो.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।।8।।

  • साधू पुरुषांचा उद्धार करण्यासाठी, दुष्ट कर्मे करणाऱ्यांच्या नाशासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी मी स्वत: युगोयुगी (प्रत्येक युगात) प्रगट होतो.

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वत: ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ।।9।।

  • हे अर्जुन ! माझा तो जन्म आणि कर्म दिव्य अर्थात् निर्मळ व अलौकिक आहेत, असे जो मनुष्य तत्त्वत: जाणतो, तो देहत्यागानंतर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच प्राप्त होतो.

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिता: ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागता: ।।10।।

  • आसक्ती, भय आणि क्रोध यातून सर्वथा मुक्त झालेले, पूर्णपणे मत्परायण झालेले, माझा आश्रय ग्रहण करणारे, आत्मज्ञानरूप तपश्चर्येने पवित्र झालेले – असे बरेचसे पुरुष यापूर्वी सहजच माझ्या स्वरूपाला येऊन मिळाले आहेत अर्थात् मला प्राप्त झाले आहेत.

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वश: ।।11।।

  • जे मला जसे भजतात, मीसुद्धा त्यांना तसाच भजतो अर्थात् त्यांच्या भावनेनुरूप त्यांना फळ देतो. कारण हे अर्जुन ! सर्वजण सर्वप्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात.

कांक्षन्त: कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवता: ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ।।12।।

  • या मनुष्यलोकी कर्मांचे फळ इच्छिणारे लोक देवतांची उपासना करतात, कारण त्यांना त्यांच्या त्या कर्मांपासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते.

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश: ।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ।।13।।

  • गुण व कर्म यांच्या भेदानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे चार वर्ण माझ्याद्वारे उत्पन्न करण्यात आले आहेत. अशाप्रकारे जरी मी त्या सृष्टिरचनादी कर्मांचा कर्ता असलो तरी मज अविनाशी परमेश्वराला तू वास्तविक अकर्ताच जाण.

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ।।14।।

  • मला कर्मफळाची आकांक्षा नसते, म्हणूनच कर्मे मला लिप्त करीत नाहीत – अशाप्रकारे जो मला तत्त्वत: जाणतो, तोसुद्धा कर्मांनी बद्ध (लेपायमान) होत नाही.

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभि: ।
कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वै: पूर्वतरं कृतम् ।।15।।

  • पूर्वीच्या मुमुक्षूंनीही याप्रमाणे जाणूनच कर्मे केली आहेत. म्हणून पूर्वजांनी पूर्वापार जसे कर्म केले, तसेच कर्म तू कर.

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिता: ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ।।16।।

  • कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय ? याबाबत निर्णय घेताना बुद्धिमान पुरुषही गोंधळून जातात. म्हणून ते कर्मांचे तत्त्व मी तुला व्यवस्थित समजावून सांगतो. ते जाणल्यावर तू अशुभातून अर्थात् कर्मबंधनातून मुक्त होशील.

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मण: ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गति: ।।17।।

  • कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे तसेच विकर्माचे (निषिद्ध कर्माचे) स्वरूपही जाणले पाहिजे, कारण कर्माची गती गहन (गूढ) आहे.

कर्मण्यकर्म य: पश्येदकर्मणि च कर्म य: ।
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्त: कृत्स्नकर्मकृत् ।।18।।

  • जो सर्व कर्मे करीत असूनही वास्तविक आपण काही करीत नाही, हे जाणतो तसेच नैष्कर्म्य अंगी बाणूनही सर्व कर्मे उत्तम प्रकारे करतो, तोच मनुष्यांमध्ये बुद्धिमान आणि तोच योगी समजावा तसेच त्याने काही न करताही सर्वकाही केल्याप्रमाणेच आहे.

यस्य सर्वे समारम्भा: कामसंकल्पवर्जिता: ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु: पण्डितं बुधा: ।।19।।

  • ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित असतात आणि ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूपी अग्नीद्वारे भस्म झाली आहेत, त्या महापुरुषाला ज्ञानीजनही ‘पंडित’ म्हणतात.

त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रय: ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित्करोति स: ।।20।।

  • जो पुरुष सर्व कर्मे व त्यांच्या फळाच्या आसक्तीचा सर्वथा त्याग करून सांसारिक आश्रयापासून रहित झालेला आहे आणि परमात्म्यातच सदैव तृप्त आहे, तो उत्तम प्रकारे कर्म करीत असूनही वास्तविक काहीच करीत नाही.

निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रह: ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ।।21।।

  • ज्याने आपले शरीर व अंत:करण वश केले आहे आणि सर्व भोगसाधनांचा त्याग केलेला आहे, असा आशारहित पुरुष केवळ शरीराने होणारी कर्मे (पाहणे, ऐकणे इ.) करीत असला तरी त्यांचा दोष त्याला लागत नाही.

यदृच्छालाभसंतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सर: ।
सम: सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ।।22।।

  • कोणत्याही इच्छेविना आपोआप जे काही प्राप्त होईल त्यातच सदैव संतुष्ट असणारा, हर्ष-शोकादी द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला, निर्मत्सर अर्थात् ईर्ष्यारहित आणि कार्याच्या सिद्धी-असिद्धीत सम राहणारा कर्मयोगी कर्मे करूनही कर्मबंधनात पडत नाही.

गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतस: ।
यज्ञायाचरत: कर्म समग्रं प्रविलीयते ।।23।।

  • ज्याची आसक्ती सर्वथा नष्ट झाली आहे, जो देहाभिमान व ममतारहित झाला आहे, ज्याचे चित्त निरंतर परमात्म्याच्या ज्ञानात स्थित आहे, असा मुक्त पुरुष यथासांग यज्ञादिक कर्मे करीत असला तरी ती सर्व कर्मे विलीन होतात (अर्थात् कर्मबंधन करीत नाहीत).

ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ।।24।।

  • ज्याच्या दृष्टीने होमसाधन ब्रह्म, हविर्द्रव्य ब्रह्म, अग्नी ब्रह्म, यजमान ब्रह्म आणि हवनक्रियाही ब्रह्म – असे सर्व कर्म ब्रह्मच असते, त्या ब्रह्मरूप कर्मांत स्थित झालेल्या योग्याला प्राप्त होण्यायोग्य फळसुद्धा ब्रह्मच आहे अर्थात् तो ब्रह्मलाच प्राप्त होतो.

दैवमेवापरे यज्ञं योगिन: पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ।।25।।

  • काही योगिजन देवपूजारूप यज्ञाचीच चांगल्या प्रकारे उपासना करतात, तर दुसरे योगिजन परब्रह्म परमात्मारूप अग्नीत अभेद-दर्शनरूप यज्ञाद्वारे आत्मारूप यज्ञाचे हवन करीत असतात.

श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ।।26।।

  • काही योगिजन संयमरूपी अग्नीत श्रोत्रादी सर्व इंद्रियांचे हवन करतात (अर्थात् इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करून आपल्या वश करून घेतात), तर दुसरे काही योगी इंद्रियरूपी अग्नीत त्यांच्या शब्दादी विषयांची आहुती देतात (अर्थात् शास्त्राने सांगितल्याप्रमाणे विषयांचा उपभोग घेतात).

सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ।।27।।

  • काही योगिजन ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम योगरूपी अग्नीत इंद्रियांच्या व प्राणांच्या सर्व क्रियांचे हवन करीत असतात.

द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतय: संशितव्रता: ।।28।।

  • काहीजण ईश्वरार्पण बुद्धीने लोकसेवेसाठी द्रव्ययज्ञ करतात, काहीजण स्वधर्मपालनरूप तपोयज्ञ करतात, काहीजण अष्टांग योगरूपी यज्ञ करतात. काहीजण अहिंसा वगैरे कठोर व्रत धारण करतात तर काही प्रयत्नशील पुरुष भगवंताच्या नावाचा जप व शास्त्रांचे अध्ययनरूप ज्ञानयज्ञ करतात.

अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणा: ।।29।।

  • प्राणायामाची साधना करणारे काही योगिजन अपानरूप अग्नीत प्राणद्रव्याचे हवन (पूरक) करतात तसेच काही प्राणरूप अग्नीत अपानद्रव्याचे हवन (रेचक) करतात आणि दुसरे योगिजन प्राण व अपान यांच्या गतींचा निरोध (कुंभक) करतात.

अपरे नियताहारा: प्राणान्प्राणेषु जुह्वति । 
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषा: ।।30।।

  • काहीजण सर्व विषयरूप आहारांचा संयम करून प्राणांतच प्राणांचे हवन (केवली कुंभक) करतात. याप्रमाणे यज्ञाने ज्यांच्या पापांचा नाश झाला आहे, असे हे सर्वच पुरुष यज्ञाचे प्रयोजन उत्तम रितीने जाणणारे (अर्थात् यज्ञवेत्ते) आहेत.

यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्य: कुरुसत्तम ।।31।।

  • हे कुरुश्रेष्ठ ! अशा यज्ञकर्मांच्या फळस्वरूपात जे ज्ञानामृत मिळते, त्याचे सेवन करणारे योगिजन सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या पुरुषासाठी इहलोकही सुखदायक होत नाही, मग परलोकाची गोष्टच कशाला ?

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ।।32।।

  • अशा प्रकारचे पुष्कळ यज्ञ वेदांनी सविस्तर सांगितलेले आहेत. त्या सर्वांना तू मन, इंद्रिये व शरीराच्या क्रियांद्वारेच उत्पन्न होणारे जाण. अशा प्रकारे तत्त्वत: जाणून त्यांच्या अनुष्ठानाद्वारे कर्मबंधनातून तू सर्वथा मुक्त होशील.

श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञ: परंतप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ।।33।।

  • हे परंतप ! द्रव्यमय यज्ञांपेक्षा ज्ञानरूप यज्ञ सर्वप्रकारे श्रेष्ठ आहे. कारण हे पार्थ ! ज्ञानात सर्व कर्मांची पूर्णपणे समाप्ती होते अर्थात् ज्ञान त्यांची पराकाष्ठा आहे.

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: ।।34।।

  • ते ज्ञान तू तत्त्वदर्शी आत्मज्ञानी पुरुषांकडे जाऊन समजून घे. त्यांना यथायोग्य साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपट भावाने, सरलतेने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्म-तत्त्वाला जाणणारे ते आत्मज्ञानी महात्मा तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील.

यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ।।35।।

  • त्यांच्याकडून ते ज्ञान जाणल्यानंतर तू पुन्हा अशा प्रकारे मोहात पडणार नाहीस आणि हे पांडव ! त्या ज्ञानाच्या योगाने तू स्वत:सहित सर्व चराचर निरंतर माझ्या स्वरूपात पाहशील.

अपि चेदसि पापेभ्य: सर्वेभ्य: पापकृत्तम: ।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ।।36।।

  • जरी तू सर्व पापी माणसांहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही ज्ञानरूपी नौकेनेच नि:संशय संपूर्ण पापसागर उत्तम प्रकारे तरून जाशील.

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्नि: सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ।।37।।

  • हे अर्जुन ! प्रज्वलित अग्नी जसे सरपणाची राखरांगोळी करतो, तसेच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्मसात् करून टाकतो.

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति ।।38।।

  • या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे असे काहीही नाही. ते ज्ञान कर्मयोगाद्वारे उत्तम प्रकारे अंत:करण शुद्ध झालेल्या मनुष्याच्या अंतरंगात कालांतराने आपोआप प्रगट होते.

श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ।।39।।

  • जितेंद्रिय, साधनतत्पर व श्रद्धाळू मनुष्यालाच असे ज्ञान प्राप्त होते. ते ज्ञान प्राप्त होताच त्याला तत्काळ भगवद्प्राप्तीरूपी परम शांती मिळते.

अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मन: ।।40।।

  • विवेकहीन, श्रद्धारहित व संशयी पुरुष परमार्थापासून अवश्य भ्रष्ट होतो. अशा संशयी पुरुषाला तर सुखही मिळत नाही तसेच त्याचे इहलोकही साधत नाही आणि परलोकही साधत नाही अर्थात् तो दोन्ही लोकी भ्रष्ट होतो.

योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसंछिन्नसंशयम् ।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय ।।41।।

  • हे धनंजय ! ज्याने कर्मयोगाद्वारे आपली सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्ञानाद्वारे ज्याचे सर्व संशय नष्ट झाले आहेत, अशा परमात्मपरायण पुरुषाला कर्मे बंधनकारक ठरत नाहीत.

तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मन: ।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ।।42।।

  • म्हणून हे भारत ! तू आपल्या हृदयातील या अज्ञानजन्य संशयाचा ज्ञानरूप खड्गाने नाश करून समत्वबुद्धिरूप कर्मयोगाचा अवलंब कर आणि युद्धासाठी सज्ज हो.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्याय: ।।4।। 

अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘ज्ञानकर्मसंन्यासयोग’ नामक चौथा अध्याय संपूर्ण झाला.

Free Download भगवत गीता अध्याय 4 मराठी

Bhagavad Gita Chapter 3 in Marathi PDF Download

Bhagavad Gita Chapter 3 in Marathi PDF Download

तिसरा अध्याय : कर्मयोग

  • दुसऱ्या अध्यायाच्या 11 ते 30व्या श्लोकापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी आत्मतत्त्व समजावून सांख्ययोगाचे निरूपण केले. नंतर 39 ते 53व्या श्लोकांत समत्वबुद्धिरूप कर्मयोगाद्वारे परमात्मप्राप्ती झालेल्या सिद्ध पुरुषाची लक्षणे, आचरण व महत्त्व प्रतिपादित केले. यात कर्मयोगाचा महिमा सांगताना 47 व 48व्या श्लोकात कर्मयोगाचे स्वरूप सांगून भगवंताने अर्जुनाला कर्म करण्यास सांगितले. 49व्या श्लोकात समत्वबुद्धिरूप कर्मयोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत निकृष्ट असल्याचे सांगितले. 50व्या श्लोकात समतावान पुरुषाची प्रशंसा करून अर्जुनाला कर्मयोगात संलग्न होण्यास सांगितले आणि 51व्या श्लोकात सांगितले की समतावान ज्ञानी पुरुषाला परम पद प्राप्त होते. हा प्रसंग ऐकून अर्जुन योग्य निर्णय घेऊ शकला नाही. म्हणून त्याविषयी आणखी स्पष्टीकरण करण्याबद्दल व निश्चितपणे कल्याण कशात आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जुन भगवंताला विचारतो.

।। अथ तृतीयोऽध्याय: ।।

  • अर्जुन उवाच :

ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ।।1।।

  • अर्जुनाने विचारले : हे जनार्दन ! कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, असे जर तुमचे निश्चित मत आहे, तर हे केशव ! युद्धासारखे घोर कर्म माझ्याकडून का करवित आहात ?

व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ।।2।।

  • तुमच्या या मिश्रित बोलण्याने माझ्या बुद्धीला काही कळेनासे झाले आहे. म्हणून यापैकी जे माझ्यासाठी सर्व दृष्टींनी श्रेयस्कर आहे, ते कृपया निश्चितपणे मला सांगा.
  • श्रीभगवानुवाच :

लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ।।3।।

  • श्रीभगवान म्हणाले : हे निष्पाप अर्जुन ! या जगात ज्ञानमार्गी लोकांसाठी ज्ञानयोग आणि कर्मयोग्यांसाठी कर्मयोग असे दोन प्रकारचे मोक्षप्राप्तीचे मार्ग मीच पूर्वी सांगितले आहेत.

न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ।।4।।

  • मनुष्य कर्मांच्या न करण्याने निष्कर्मतेला अर्थात् योगनिष्ठेला प्राप्त होत नाही तसेच त्यांचा केवळ त्याग करण्यानेही भगवद्-साक्षात्काररूप सिद्धीस अर्थात् सांख्यनिष्ठेस प्राप्त होत नाही.

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणै: ।।5।।

  • नि:संशय कोणीही केव्हाही क्षणभरही कर्म केल्यावाचून राहू शकत नाही. कारण सर्व मनुष्यसमुदाय प्रकृतिजन्य गुणांनी पराधीन होऊन कर्म करीतच असतो.

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ।
इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचार: स उच्यते ।।6।।

  • जो मूढबुद्धी पुरुष सर्व इंद्रियांना हट्टाने वरवर संयमित करून मनातून त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत असतो, त्याला मिथ्याचारी अर्थात् दांभिक म्हटले जाते.

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियै: कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ।।7।।

  • परंतु हे अर्जुन ! जो पुरुष मनाने इंद्रियांना वश करून आसक्त न होता सर्व इंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो, तोच श्रेष्ठ होय.

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण: ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मण: ।।8।।

  • शास्त्रविधीने नेमलेले स्वधर्मरूप कर्म तू फलाकांक्षा सोडून कर. कारण कर्म न करण्यापेक्षा शास्त्रोक्त कर्म करणे श्रेष्ठ आहे. शिवाय कर्म केल्यावाचून तुझे शरीर-व्यवहारही चालणार नाहीत.

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धन: ।
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्ग: समाचर ।।9।।

  • स्वधर्माचरण हाच नित्ययज्ञ आहे. या यज्ञासाठी (अर्थात् भगवद्प्रीत्यर्थ) केलेल्या कर्मांशिवाय इतर कर्मांमध्ये गुंतलेला मनुष्य कर्मबंधनात पडतो. म्हणून हे अर्जुन ! तू आसक्ती सोडून या यज्ञासाठीच उत्तम प्रकारे कर्तव्यकर्म कर.

सहयज्ञा: प्रजा: सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति: ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ।।10।।

  • कल्पाच्या आरंभी प्रजापती ब्रह्मदेवांनी नित्ययज्ञासह सर्व जीवांची उत्पत्ती करून त्यांना सांगितले की तुम्ही सर्व या यज्ञाद्वारे वृद्धीला प्राप्त व्हा आणि हा यज्ञ तुमचे मनोरथ पूर्ण करणारा होवो.

देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु व: ।
परस्परं भावयन्त: श्रेय: परमवाप्स्यथ ।।11।।

  • तुम्ही या यज्ञाद्वारे देवांना उन्नत (संतुष्ट) करा आणि ते देव तुम्हाला उन्नत करोत. याप्रकारे नि:स्वार्थभावाने परस्परांना उन्नत करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल.

इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविता: ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव स: ।।12।।

  • यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्ही न मागताही सर्व इष्ट भोग तुम्हाला निश्चितच देत राहतील. अशाप्रकारे त्या देवांनी दिलेल्या भोगांना जो पुरुष त्यांना न देता स्वत:च उपभोगतो, तो चोरच होय.

यज्ञशिष्टाशिन: सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषै: ।
भुंजते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ।।13।।

  • यज्ञ करून शिल्लक उरलेले अन्न ग्रहण करणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांतून मुक्त होतात. याउलट जे पापी लोक केवळ स्वत:च्या शरीराच्या पोषणासाठीच अन्न खातात, ते तर पापच भक्षण करतात.

अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभव: ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञ: कर्मसमुद्भव: ।।14।।
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ।।15।।

  • सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो. यज्ञ शास्त्रोक्त कर्मांपासून उत्पन्न होतो. कर्म वेदांपासून व वेद साक्षात् अविनाशी परब्रह्मपासून उत्पन्न झालेले आहेत, असे जाण. यावरून हे सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञांत प्रतिष्ठित असतो.

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह य: ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ।।16।।

  • हे पार्थ ! अशा रितीने इहलोकी सुरू केलेल्या सृष्टिचक्राला अनुसरून जो वागत नाही अर्थात् शास्त्रानुसार कर्म करीत नाही, तो इंद्रियसुखांतच निमग्न पापी पुरुष व्यर्थच जगतो.

यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानव: ।
आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ।।17।।

  • परंतु जो मनुष्य आत्म्यातच निरंतर रमलेला, आत्म्यातच तृप्त व आत्म्यातच संतुष्ट असतो, त्याला कोणतेही कर्तव्य राहत नाही.

नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रय: ।।18।।

  • या जगात त्या आत्मतुष्ट महापुरुषाला कर्म करण्याने कोणताही लाभ नाही किंवा न करण्याने हानी नाही तसेच कोणत्याही प्राणिमात्रापासून त्याला कोणताही स्वार्थ साधावयाचा नसतो.

तस्मादसक्त: सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुष: ।।19।।

  • म्हणून तू कर्मफळाची आसक्ती न ठेवता नेहमी कर्तव्यकर्मांचे चांगल्या प्रकारे आचरण कर. कारण अनासक्त भावाने स्वकर्म करणारा मनुष्य परमात्म्याला प्राप्त होतो.

कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादय: ।
लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ।।20।।

  • हे अर्जुन ! जनकादिक ज्ञानी पुरुषांनीही अनासक्त होऊन शास्त्रोक्त कर्म करूनच परम सिद्धी प्राप्त केली आहे; शिवाय लोकसंग्रहाकडे पाहूनही (अर्थात् लोकांना शिकवण मिळावी म्हणून) तू कर्म करणेच योग्य आहे.

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन: ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ।।21।।

  • कारण या जगात श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, इतर लोकही त्याप्रमाणेच वागतात. तो पुरुष जी गोष्ट प्रमाणभूत मानतो, तिचेच अनुकरण इतर लोकही करतात.

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ।।22।।

  • हे पार्थ ! जरी मला तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि न मिळालेले काही मिळवावयाचे आहे, असेही नाही तरीही मी निरिच्छपणे स्वकर्माचे आचरण करीतच असतो.

यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रित: । 
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वश: ।।23।।

  • जर मी दक्षतेने कर्मांचे आचरण केले नाही तर मोठी हानी होईल, कारण हे पार्थ ! सर्व लोक सर्वप्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करीत असतात.

उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् ।
संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमा: प्रजा: ।।24।।

  • जर मी कर्म केले नाही तर सर्व लोक नष्ट-भ्रष्ट होतील तसेच मी वर्णसंकर प्रजेच्या उत्पत्तीस कारणीभूत आणि या संपूर्ण प्रजेचा घात करणारा होईन.

सक्ता: कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।
कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम् ।।25।।

  • हे भारत ! ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळाच्या आशेने कर्मांमध्ये आसक्त राहून कर्म करतात, त्याचप्रमाणे फळाची आशा नसणाऱ्या विद्वानानेही समाजव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी अनासक्त राहून शास्त्रानुसार कर्मे करावीत.

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् ।
जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्त: समाचरन् ।।26।।

  • परमात्मस्वरूपात दृढतेने स्थित ज्ञानी पुरुषाने शास्त्रोक्त कर्मांत आसक्त असणाऱ्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम अर्थात् कर्मांत अश्रद्धा उत्पन्न करू नये. याउलट सर्व शास्त्रोक्त कर्मांचे स्वतः यथायोग्यरित्या आचरण करून त्यांनाही आचरण करायला लावावे.

प्रकृते: क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वश: ।
अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ।।27।।

  • वास्तविक सर्व कर्मे सर्वप्रकारे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारेच केली जातात, परंतु ज्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झालेले आहे, असा अज्ञानी पुरुष ‘मी कर्ता आहे’ असे मानतो.

तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयो: ।
गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ।।28।।

  • परंतु हे महाबाहू ! गुणविभाग व कर्मविभाग यांचे तत्त्व (अर्थात् गुण व कर्म यांच्याहून आत्मा भिन्न असून तो निर्लेप आहे असे) जाणणारा ज्ञानी पुरुष सर्व गुण गुणांमध्ये वर्तत आहेत अर्थात् इंद्रियेच विषयांत वावरतात, असे समजून त्यांत आसक्त होत नाही.

प्रकृतेर्गुणसम्मूढा: सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत् ।।29।।

  • प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेले पुरुष गुण व कर्मे यांत आसक्त होत असतात. त्या पूर्णपणे समज नसलेल्या मंदबुद्धी लोकांना पूर्ण ज्ञानी पुरुषाने त्यांच्या कर्मासक्तीपासून विचलित करू नये.

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वर: ।।30।।

  • हे अर्जुन ! मज अंतर्यामी परमात्म्यात चित्त लावून सर्व कर्मे मला अर्पण करून आशारहित, ममतारहित होऊन तसेच नि:शंक होऊन युद्ध कर.

ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवा: ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभि: ।।31।।

  • जे कोणी पुरुष दोषबुद्धिरहित व श्रद्धायुक्त होऊन नेहमी माझ्या या मताला अनुसरून वागतात, ते सर्व कर्मांतून मुक्त होतात.

ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतस: ।।32।।

  • परंतु जे माझ्यात दोषारोपण करीत माझ्या या मताप्रमाणे वागत नाहीत, त्या सर्व ज्ञानास मुकलेल्या लोकांना तू कल्याण-मार्गापासून भ्रष्ट झालेलेच समज.

सदृशं चेष्टते स्वस्या: प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह: किं करिष्यति ।।33।।

  • सर्व प्राणी आपल्या स्वभावानुसार कर्म करीत असतात. ज्ञानी पुरुषही आपल्या स्वभावानुसारच आचरण करतो. मग याविषयी कोणी बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे ?

इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ।।34।।

  • प्रत्येक इंद्रियांच्या भोग्य विषयांमध्ये असलेली जी आसक्ती आणि द्वेष आहे, मनुष्याने त्या दोहोंच्या अधीन होऊ नये. कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याणमार्गात विघ्न आणणारे मोठे शत्रू आहेत.

श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: ।।35।।

  • उत्तम प्रकारे आचरणात आणलेल्या परधर्मापेक्षा गुणरहित असला तरी स्वधर्मच अति उत्तम आहे. स्वधर्मात मरण पावणेही कल्याणकारक आहे; पण दुसऱ्यांचा धर्म भीतिदायक आहे.
  • अर्जुन उवाच :

अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुष: ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित: ।।36।।

  • अर्जुनाने विचारले : हे वार्ष्णेय ! तर मग इच्छा नसतानाही बळेच करावयास लावल्याप्रमाणे हा मनुष्य कोणाकडून प्रेरित होऊन पापकर्मे करतो ?
  • श्रीभगवानुवाच :

काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भव: ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ।।37।।

  • श्रीभगवान म्हणाले : रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा अग्नीप्रमाणे भोगांनी तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. यालाच तू याविषयी शत्रू जाण.

धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च ।
यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ।।38।।

  • जसे धुराने अग्नी, धुळीने आरसा व वारेने गर्भ आच्छादिलेला असतो, तसेच या कामाद्वारे हे ज्ञान आच्छादिलेले आहे.

आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ।।39।।

  • हे कौंतेय ! ज्ञानी पुरुषांचा नित्य शत्रू असलेल्या या कामाने ज्ञान झाकून टाकले आहे. हा अग्नीप्रमाणेच कधीही तृप्त होत नाही.

इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ।।40।।

  • इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची आश्रयस्थाने म्हटली जातात. यांच्याद्वारे हा काम ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहात पाडतो.

तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ।।41।।

  • म्हणून हे भरतर्षभ ! तू प्रथम इंद्रियांना वश करून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या महापापी कामाला निश्चयपूर्वक मारून टाक अर्थात् त्याचा पूर्णपणे त्याग कर.

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्य: परं मन: ।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे: परतस्तु स: ।।42।।

  • इंद्रियांना या स्थूल शरीराच्या पलीकडचे अर्थात् श्रेष्ठ, बलवान व सूक्ष्म म्हटले जाते. इंद्रियांच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि जो बुद्धीच्याही अत्यंत पलीकडे आहे, तो आत्मा आहे.

एवं बुद्धे: परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ।।43।।

  • अशाप्रकारे बुद्धीच्याही पलीकडचा अर्थात् सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ अशा आत्म्याला जाणून आणि बुद्धीद्वारे मनाला वश करून हे महाबाहू ! तू या कामरूपी दुर्जय शत्रूला मारून टाक.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्याय: ।।3।।

अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘कर्मयोग’ नामक तिसरा अध्याय संपूर्ण झाला.

Free Download भगवत गीता अध्याय 3 मराठी

Bhagavad Gita Chapter 2 in Marathi PDF Download

Bhagavad Gita Chapter 2 in Marathi PDF Download

दुसरा अध्याय : सांख्ययोग

  • पहिल्या अध्यायात गीतेत दिलेल्या उपदेशाच्या प्रस्तावनेच्या रूपात दोन्ही सैन्यांच्या महारथींचे व शंखध्वनी केल्यानंतर अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्याचे वर्णन येते. नंतर दोन्ही पक्षांतील आपल्या नातलगांना पाहून शोक व मोहामुळे अर्जुनाने युद्धास नकार दिला आणि विषादग्रस्त होऊन शस्त्रास्त्रांचा त्याग केला. नंतर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कशा प्रकारे पुन्हा युद्धासाठी तयार केले, हे सर्व सांगणे आवश्यक असल्याने अर्जुनाच्या मनःस्थितीचे वर्णन करताना संजय दुसरा अध्याय आरंभ करतो.

।। अथ द्वितीयोऽध्याय: ।।

  • संजय उवाच :

तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदन: ।।1।।

  • संजय म्हणाला : करुणेने भारावलेल्या, अश्रूंनी डोळे भरून आलेल्या त्या विषादग्रस्त अर्जुनाला पाहून श्रीमधुसूदन म्हणाले.
  • श्रीभगवानुवाच :

कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ।।2।।
क्लैब्यं मा स्म गम: पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ।।3।।

  • श्रीभगवान म्हणाले : हे अर्जुन ! युद्धाच्या या बिकट प्रसंगी हे अज्ञान तुझ्यात कोठून आले ? हे आर्यांना न शोभणारे, असलेली कीर्ती धुळीस मिळविणारे आणि स्वर्गलोक गमविणारे आहे. हे अर्जुन ! अशा हीन नपुंसकतेची कास धरू नकोस. तुला हे शोभत नाही. हे परंतप ! हृदयाची तुच्छ दुर्बळता त्यागून युद्धासाठी सज्ज हो.
  • अर्जुन उवाच :

कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभि: प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ।।4।।

  • अर्जुन म्हणाला : हे मधुसूदन ! हे अरिसूदन ! मला पूजनीय असलेल्या भीष्मपितामह व द्रोणाचार्यांशी मी रणांगणावर कसा लढू?

गुरूनहत्वा हि महानुभावा-ञ्छ्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान्रुधिरप्रदिग्धान् ।।5।।

  • या थोर, पूज्य गुरुजनांना न मारता या जगात भिक्षान्न खाऊन जगणेही मला अधिक कल्याणप्रद वाटते. कारण या गुरुजनांना मारून त्यांच्या रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच मला येथे भोगावे लागतील ना ?

न चैतद्विद्म: कतरन्नो गरीयो-यद्वा जयेम यदि वा नो जयेयु: ।
यानेव हत्वा न जिजीविषाम-स्तेऽवस्थिता: प्रमुखे धार्तराष्ट्रा: ।।6।।

  • युद्ध करणे अथवा न करणे, या दोहोंपैकी काय श्रेष्ठ आहे ते आम्हाला कळत नाही तसेच आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेदेखील आम्हाला माहीत नाही आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याची मुळीच इच्छा नाही, ते धृतराष्ट्रपुत्र तर आमच्या समोर युद्धाला उभे ठाकले आहेत.

कार्पण्यदोषोपहतस्वभाव: पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता: ।
यच्छ्रेय: स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ।।7।।

  • स्वजनांविषयीच्या मोहामुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि चित्ताला योग्य काय ते कळेनासे झाले आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी धर्माला अनुसरून निश्चितपणे सर्वांत श्रेयस्कर काय आहे, याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. मी तुम्हाला शिष्यभावाने शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश द्यावा.

न हि प्रपश्यामि ममापनुद्या-द्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं-राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ।।8।।

  • पृथ्वीचे निष्कंटक, धनधान्यसंपन्न राज्य मिळाले, किंबहुना इंद्रपद मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही.
  • संजय उवाच :

एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेश: परन्तप ।
न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ।।9।।

  • संजय म्हणाला : राजन् ! निद्रेला जिंकणाऱ्या परंतप अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना याप्रमाणे सांगितले आणि ‘हे गोविंद ! मी मुळीच युद्ध करणार नाही’ असे पुन्हा स्पष्टपणे सांगून तो गप्प बसला.

तमुवाच हृषीकेश: प्रहसन्निव भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वच: ।।10।।

  • हे भरतवंशजा ! दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभे राहून अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण विषण्ण होऊन बसलेल्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले.
  • श्रीभगवानुवाच :

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिता: ।।11।।

  • श्रीभगवान म्हणाले : हे अर्जुन ! तू ज्यांच्याबद्दल शोक करू नये, त्यांच्याबद्दल शोक करतोस आणि वर शहाणपणाच्या गोष्टीही सांगतोस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतकांबद्दलही शोक करीत नाहीत.

न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपा: ।
न चैव न भविष्याम: सर्वे वयमत: परम् ।।12।।

  • ज्याकाळी मी, तू आणि हे सर्व राजेलोक अस्तित्वात नव्हते, असा काळ कधीही नव्हता तसेच आपण सर्वजण यापुढे नसणार असेही नाही.

देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ।।13।।

  • ज्याप्रमाणे जीवात्म्याला या देहात बालपण, तारुण्य व वार्धक्य येते, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहात प्रवेश करतो. हे जाणणाऱ्या धीर, विवेकी पुरुषाला त्याबाबतीत दुःख होत नाही.
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदु:खदा: । आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ।।14।।
  • हे कौंतेय ! तात्पुरती उत्पन्न होणारी व यथायोग्यकाळी विनाश पावणारी जी सुख-दुःखे आहेत, ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या-जाण्याप्रमाणे अनित्य आहेत. हे भरतवंशजा ! ती सुख-दुःखे इंद्रियांचे विषयांशी संयोग झाल्याने निर्माण होतात, म्हणून तू क्षुब्ध न होता त्यांना सहन कर.

यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ।।15।।

  • हे पुरुषश्रेष्ठ ! सुख-दुःखांनी विचलित न होणाऱ्या व दोन्ही अवस्थांमध्ये सम राहणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषय व्याकूळ करीत नाहीत, तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य अर्थात् पात्र आहे.

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभि: ।।16।।

  • असत् अर्थात् अनित्य वस्तू कधीच अस्तित्वात नसते आणि सत् अर्थात् नित्य वस्तू कधीही नाहीशी होत नाही. याप्रमाणे तत्त्वज्ञानी पुरुषांनी या दोहोंचेही तत्त्व जाणले आहे.

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ।।17।।

  • ज्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे, त्याला तू अविनाशी जाण. या अविनाशी तत्त्वाचा नाश करण्यात कोणीही समर्थ नाही.

अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता: शरीरिण: ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ।।18।।

  • या अविनाशी, अप्रमेय (कोणत्याही प्रमाणाने न कळणाऱ्या) व नित्यस्वरूप जीवात्म्याचे हे सर्व देह नाशवंत म्हटले गेले आहेत. अर्थात् जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे, म्हणून हे भरतवंशी अर्जुन ! तू युद्ध कर.

य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ।।19।।

  • जो या आत्म्याला मारणारा समजतो आणि जो याला मेलेला समजतो, ते दोघेही खरे जाणत नाहीत. कारण हा आत्मा कोणाला मारतही नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही.

न जायते म्रियते वा कदाचि-
न्नायं भूत्वा भविता वा न भूय: ।
अजो नित्य: शाश्वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे ।।20।।

  • हा आत्मा कधीही जन्मत नाही किंवा मरतही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही; कारण आत्मा हा अजन्मा, नित्य, सनातन व पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही.

वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।
कथं स पुरुष: पार्थ कं घातयति हन्ति कम् ।।21।

  • हे पार्थ ! जो पुरुष जाणतो की हा आत्मा अविनाशी, नित्य, अजन्मा आणि अव्यय (अक्षय) आहे, तो पुरुष कोणाला कसा बरे मारेल किंवा दुसऱ्याकडून कसा मारून घेईल ?

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । 
तथा शरीराणि विहाय जीर्णा-न्यन्यानि संयाति नवानि देही ।।22।।

  • जसे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून दुसरी नवी वस्त्रे धारण करतो, तसेच जीवात्मासुद्धा जुन्या शरीरांचा त्याग करून दुसऱ्या नवीन शरीरांना धारण करतो.

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ।।23।।

  • या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही.

अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्य: सर्वगत: स्थाणुरचलोऽयं सनातन: ।।24।।

  • हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजविता न येणारा आणि सुकविता न येणारा आहे. हा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे.

अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ।।25।।

  • हा आत्मा अव्यक्त (इंद्रियांना अगोचर), अचिंत्य (तर्काने न समजणारा) आणि विकाररहित (कधी न बदलणारा) म्हटला जातो. म्हणून हे अर्जुन ! या आत्म्याला अशा प्रकारचा जाणून तू शोक करावयास योग्य नाहीस अर्थात् तू शोक करणे उचित नाही.

अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ।।26।।

  • आणि जरी तू याला सदा जन्मणारा व सदा मरणारा मानत असशील, तरीदेखील हे महाबाहू ! तू याच्याविषयी शोक करणे योग्य नाही.

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ।।27।।

  • कारण असे असल्यामुळे जन्म झालेल्याचा मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू झालेल्याचा पुन्हा जन्म अटळ आहे. म्हणून टाळता न येणाऱ्या गोष्टीबद्दल शोक करणे तुला उचित नाही.

अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ।।28।।

  • हे अर्जुन ! सर्व जीव जन्मापूर्वी शरीररहित होते आणि मृत्यूनंतरही शरीररहितच होणार आहेत; केवळ मध्यंतरीच शरीरधारी दिसत आहेत, तर मग याविषयी चिंता कसली ?

आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेन-माश्चर्यवद्वदति तथैव चान्य: ।
आश्चर्यवच्चैनमन्य: शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ।।29।।

  • एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याच्या वस्तूप्रमाणे पाहतो आणि त्याचप्रमाणे दुसरा एखादा महापुरुष याच्या तत्त्वाचे आश्चर्यासारखे वर्णन करतो तसेच दुसरा एखादा अधिकारी पुरुषच आश्चर्यकारक गोष्ट ऐकावी तसे याच्याविषयी ऐकतो. परंतु कोणी कोणी तर याच्याबद्दल ऐकूनही या आत्म्याला मुळीच जाणत नाहीत.

देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ।।30।।

  • हे भारत ! सर्वांच्या शरीरात असणाऱ्या आत्म्याचा कधीही नाश करता येत नाही, तो अवध्य आहे. म्हणून सर्व प्राणिमात्रांविषयी तू शोक करण्यास योग्य नाहीस.

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ।।31।।

  • शिवाय स्वधर्माकडे पाहिले असताही तू भयभीत होणे योग्य नाही, कारण क्षत्रियाला स्वधर्मोचित युद्धाहून अधिक असे दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही.

यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिन: क्षत्रिया: पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ।।32।।

  • हे पार्थ ! तुझ्या सुदैवाने आपोआपच प्राप्त झालेले हे युद्ध जणू उघडलेले स्वर्गाचे द्वारच आहे. अशा प्रकारचे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते.

अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।
तत: स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ।।33।।

  • जर तू हे धर्मोचित युद्ध केले नाहीस तर स्वधर्म व कीर्ती गमावून बसशील आणि तुला निश्चितपणे पाप लागेल.

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ।
सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ।।34।।

  • शिवाय सर्व लोक चिरकाळ राहणाऱ्या तुझ्या अपकीर्तीविषयी बोलत राहतील आणि सन्मान्य पुरुषासाठी अपकीर्ती मरणाहूनही अधिक वाईट असते.

भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथा: ।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ।।35।।

  • महारथी तुला ‘घाबरून तू रणांगणातून पाय काढलास’ असे समजतील आणि ज्यांना तुझ्याविषयी अत्यंत आदर होता, तेच तुला तुच्छ मानतील.

अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिता: ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दु:खतरं नु किम् ।।36।।

  • तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील आणि अनेक प्रकारचे बोलू नयेत असे अपशब्द तुला बोलतील. मग याहून अधिक दुःख ते कोणते ?

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय: ।।37।।

  • एकतर तू युद्धात मारला जाऊन स्वर्गात जाशील अथवा युद्ध जिंकून पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कौंतेय ! तू दृढ निश्चय करून युद्धासाठी सज्ज हो.

सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ।।38।।

  • सुख-दु:ख, लाभ-हानी व जय-पराजय यांना समान समजून तू युद्ध कर. अशा रितीने युद्ध केल्यास तुला पाप लागणार नाही.

एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ।।39।।

  • हे पार्थ ! आतापर्यंत मी तुला ज्ञानयोगाबद्दल सांगितले. आता मी कर्मयोगाविषयी सांगतो, ऐक. जर तू या ज्ञानाने युक्त होऊन कर्म केलेस तर कर्मांचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील अर्थात् कर्मबंधनातून योग्यप्रकारे मुक्त होशील.

नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ।।40।।

  • या कर्मयोगात आरंभाचा अर्थात् बीजाचा नाश होत नाही आणि विरुद्ध फळ होण्याचा दोषही यात घडत नाही, उलट या कर्मयोगरूपी धर्माचे थोडेसेही साधन जन्म-मरणरूपी महान भयापासून रक्षण करते.

व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ।।41।।

  • जे या कल्याण-मार्गावर असतात त्यांची बुद्धी निश्चयात्मक असते आणि त्यांचे ध्येयही एकच असते. परंतु हे कुरुनंदन ! जे अस्थिर वृत्तीचे असतात, त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात अर्थात् अस्थिर विचारांच्या, अविवेकी व सकाम मनुष्यांची बुद्धी निश्चितच भेददृष्टी ठेवणारी आणि अनियंत्रित असते.

यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चित: ।
वेदवादरता: पार्थ नान्यदस्तीति वादिन: ।।42।।

  • हे अर्जुन ! वेदांच्या आधारे कर्माची महती पटविणारे वेदवेत्ते तसेच यज्ञादी कर्मांच्या योगाने स्वर्गसुख भोगावे, त्यावाचून दुसरे सुखच नाही – असे म्हणणारे ही जी भुलविणारी कर्मफळविषयक भाषा बोलतात, ते दुर्बुद्धी होत.

कामात्मान: स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ।।43।।

  • विविध कामनांनी ग्रस्त, स्वर्गाच्या मागे लागलेले असे हे लोक विषयभोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठी अनेक विशेष धार्मिक क्रिया असलेली, जन्मरूप फळ देणारी कर्मे करतात.

भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धि: समाधौ न विधीयते ।।44।।

  • भोग व ऐश्वर्यात गढून गेलेल्या आणि त्या मोहक वाणीने चित्त हिरावून घेतलेल्या त्यांच्या अंतःकरणात परमात्मविषयक बुद्धी स्थिर होत नाही.

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वोे नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ।।45।।

  • वेद हे त्रिगुणात्मक आहेत. ते प्रामुख्याने प्रकृतीच्या तीन गुणांचे, सर्व भोगांचे तसेच त्यांच्या साधनांचे विवेचन करतात. हे अर्जुन ! तू या तिन्ही गुणांचा त्याग कर, सर्व द्वंद्वांतून मुक्त हो. योगक्षेमाची चिंता करू नकोस आणि सदैव आत्मपरायण हो.

यावानर्थ उदपाने सर्वत: सम्प्लुतोदके ।
तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत: ।।46।।

  • मनुष्याला सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाला असता लहानशा जलाशयाशी त्याचे जितके प्रयोजन राहते, तितकेच ब्रह्मला तत्त्वतः जाणणाऱ्या ब्राह्मणाचे (ज्ञानी पुरुषाचे) सर्व वेदांशी राहते.
    (अर्थात् मोठा जलाशय प्राप्त झाल्यानंतर ज्याप्रमाणे लहान जलाशयाची आवश्यकता राहत नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मानंदाची प्राप्ती झाल्यावर आनंदाप्रीत्यर्थ वेदांची आवश्यकता राहत नाही.)

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ।।47।।

  • कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, पण त्या कर्मफळाची आस्था मात्र मुळीच बाळगू नकोस. फळाचा हेतू न ठेवता तू स्वधर्मरूप कर्म कर तसेच कर्म न करण्याचेही मनात आणू नकोस.

योगस्थ: कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनंजय ।
सिद्ध्यसिद्ध्यो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते ।।48।।

  • हे धनंजय ! फळाची आशा सोडून, योगयुक्त होऊन कर्तव्यकर्मे कर. ती पूर्ण झाली असता आनंदाने हुरळून जाऊ नकोस किंवा अपूर्ण राहिल्याने खिन्न होऊ नकोस. पूर्णापूर्ण कर्मांविषयी चित्ताचा जो समभाव आहे, त्यालाच योग म्हणतात.

दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा: फलहेतव: ।।49।।

  • हे धनंजय ! समत्व बुद्धियोगयुक्त होऊन केलेल्या निष्काम कर्माच्या तुलनेत सकाम कर्म अगदीच निकृष्ट आहे. म्हणून तू समत्व बुद्धियोगाचाच आश्रय घे कारण फळाच्या आशेने कर्म करणारे अत्यंत दीन आहेत.

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम् ।।50।।

  • समबुद्धियुक्त मनुष्य पाप-पुण्य इहलोकीच त्यागून देतो, अर्थात् त्यांच्यापासून मुक्त होतो. म्हणून तू समत्वरूप योगासाठीच प्रयत्न कर. हा समत्वयोगच सर्व कर्मांतील कौशल्य अर्थात् कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे.

कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिण: ।
जन्मबन्धविनिर्मुक्ता: पदं गच्छन्त्यनामयम् ।।51।।

  • समबुद्धियुक्त विद्वान पुरुष कर्मे तर करतात पण फळाचा त्याग करतात, त्यामुळे जन्म-मरणरूपी बंधनातून मुक्त होऊन निर्विकार परम पदास प्राप्त होतात.

यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ।।52।।

  • जेव्हा तुझी बुद्धी मोहाच्या दलदलीतून पूर्णपणे बाहेर पडेल, तेव्हा इहलोक व परलोकासंबंधी ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या सर्व भोगांपासून तुला वैराग्य प्राप्त होईल.

श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ।।53।।

  • नाना तऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचल आणि स्थिर होईल, तेव्हा तुला समत्वरूप योग प्राप्त होईल अर्थात् परमात्म्याशी तुझा नित्य संयोग होईल.
  • अर्जुन उवाच :

स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधी: किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ।।54।।

  • अर्जुन म्हणाला : हे केशव ! समाधीत स्थित असा स्थितप्रज्ञ (स्थिरबुद्धी) पुरुष कोणत्या लक्षणांवरून ओळखावा ? तो कसा बोलतो ? कसा राहतो आणि कसा चालतो ?
  • श्रीभगवानुवाच :

प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्ट: स्थितप्रज्ञस्तदोच्यते ।।55।।

  • श्रीभगवान म्हणाले : हे पार्थ ! जो पुरुष मनातील सर्व कामनांचा जेव्हा त्याग करतो आणि आत्मसुखातच ज्याचे मन सर्वदा तृप्त असते, तेव्हा त्याला ‘स्थितप्रज्ञ’ म्हटले जाते.

दु:खेष्वनुद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह: ।
वीतरागभयक्रोध: स्थितधीर्मुनिरुच्यते ।।56।।

  • अनेक प्रकारचे दुःख आले तरी ज्याचे मन उद्विग्न होत नाही आणि सुख मिळाले तरी जो त्यात आसक्त होत नाही तसेच ज्याचे काम, क्रोध आणि भय सर्वथा नष्ट झाले आहेत, असा मुनी ‘स्थिरबुद्धी’ म्हटला जातो.

य: सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।57।।

  • जो प्राणिमात्रांविषयी दयाळू असूनही कोठेही आसक्त नसतो, काही बरे-वाईट झाल्याने ज्याला संतोष वा विषाद वाटत नाही, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजले पाहिजे.

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वश: ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।58।।

  • ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून आपली इंद्रिये संयमित करतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजले पाहिजे.

विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन: ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ।।59।।

  • इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या मनुष्याचे केवळ विषयच निवृत्त होतात, त्यांच्यातील आसक्ती नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीसुद्धा परमात्म्याच्या साक्षात्काराने निवृत्त होते.

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चित: ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मन: ।।60।।

  • हे कौंतेय ! आसक्तीचा नाश न झाल्यामुळे ही प्रबळ व उच्छृंखल इंद्रिये प्रयत्नरत बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही बळजबरीने विषयांकडे ओढून नेतात.

तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पर: ।
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।61।।

  • म्हणून त्या सर्व इंद्रियांना वश करून चित्ताचा माझ्याशी योग करून व मत्परायण होऊन रहावे. कारण ज्या पुरुषाची इंद्रिये त्याच्या स्वाधीन (वश) असतात, त्याची बुद्धी स्थिर होते.

ध्यायतो विषयान्पुंस: सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्संजायते काम: कामात्क्रोधोऽभिजायते ।।62।।

  • विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयांत आसक्ती उत्पन्न होते. त्यामुळे ते आपल्याला मिळावेत अशी कामना उत्पन्न होते आणि ती पूर्ण न झाल्यास क्रोध उत्पन्न होतो.

क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम: । 
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ।।63।।

  • क्रोधामुळे संमोह (सारासार विवेक नाहीसा) होतो. संमोहामुळे स्मृती नाहीशी होते. स्मृती नाहीशी झाली की बुद्धीचा नाश होतो. बुद्धीचा नाश झाला असता संपूर्ण ज्ञान नाहीसे होते. परिणामी हा पुरुष आपल्या श्रेयस्थितीपासून अध:पतित होतो.

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ।।64।।

  • परंतु स्वाधीन अंत:करणाचा पुरुष आसक्ती-द्वेषरहित आणि स्ववश केलेल्या इंद्रियांद्वारे विषयांचा उपभोग करीत असूनही अंत:करणाची प्रसन्नता प्राप्त करतो

प्रसादे सर्वदु:खानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धि: पर्यवतिष्ठते ।।65।।

  • अंत:करणाच्या प्रसन्नेतेच्या योगाने त्याच्या सर्व दु:खांचा अंत होतो आणि त्या प्रसन्नचित्त कर्मयोग्याची बुद्धी लवकरच सगळीकडून परावृत्त होऊन एका परमात्म्यातच उत्तमप्रकारे स्थिर होते.

नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयत: शान्तिरशान्तस्य कुत: सुखम् ।।66।।

  • मन व इंद्रिये स्वाधीन नसलेल्या पुरुषाची बुद्धी कधीही स्थिर नसते तसेच त्या अयुक्त पुरुषाच्या अंत:करणात आस्तिक भावही नसतो. त्या भावनाहीन पुरुषाला शांती मिळत नाही, मग तशा शांतिरहित पुरुषाला सुख तरी कसे मिळू शकेल ?

इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ।।67।।

  • ज्याप्रमाणे पाण्यातील नौकेला सोसाट्याचा वारा भरकटत नेतो, त्याचप्रमाणे विषयांमध्ये भरकटणाऱ्या इंद्रियांपैकी ज्या इंद्रियाबरोबर मन राहते, ते एकटेच इंद्रिय त्या अयुक्त पुरुषाच्या बुद्धीचे हरण करते.

तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वश: ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।68।।

  • म्हणून हे महाबाहू ! ज्या पुरुषाची इंद्रिये सर्वप्रकारे इंद्रियांच्या विषयांपासून नियंत्रित केलेली असतात, त्याचीच बुद्धी स्थिर आहे, असे समजावे.

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुने: ।।69।।

  • संपूर्ण प्राणिमात्रांसाठी जे रात्रीसमान आहे, त्या नित्य, ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीसाठी स्थितप्रज्ञ योगी जागत असतो आणि ज्या नाशवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीसाठी सर्व प्राणी जागतात, परमात्म-तत्त्व जाणणाऱ्या मुनीसाठी ते रात्रीसमान आहे.

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमाप: प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ।।70।।

  • ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी परिपूर्ण व अचल असलेल्या समुद्रात अनेक नद्यांचे पाणी त्याला चंचल न करताच प्रवेश करते, त्याप्रमाणे ज्या स्थितप्रज्ञ पुरुषात सर्व विषयभोग कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच प्रवेश करतात, तोच पुरुष परम शांतीस प्राप्त होतो; विषयभोगांची इच्छा करणारा नव्हे.

विहाय कामान्य: सर्वान्पुमांश्चरति नि:स्पृह: ।
निर्ममो निरहंकार: स शान्तिमधिगच्छति ।।71।।

  • जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून, ममतारहित, अहंकाररहित व स्पृहारहित होऊन जगात वावरतो, त्यालाच शांती लाभते.

एषा ब्राह्मी स्थिति: पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ।।72।।

  • हे पार्थ ! ही ब्रह्मप्राप्ती झालेल्या पुरुषाची स्थिती आहे. ही प्राप्त झाली असता योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळीही या निष्ठेत स्थित होऊन ब्रह्मानंदास प्राप्त होतो.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्याय: ।।2।।

अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘सांख्ययोग’ नामक दुसरा अध्याय संपूर्ण झाला.

Free Download भगवत गीता अध्याय 2 मराठी

Bhagavad Gita Chapter 1 in Marathi PDF Download

Bhagavad Gita Chapter 1 in Marathi PDF Download

पहिला अध्याय : अर्जुनविषादयोग

  • भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला गीतेच्या रूपात महान उपदेश दिला आहे. हा पहिला अध्याय त्या उपदेशाची प्रस्तावनाच आहे. कौरव-पांडव या दोन्ही पक्षांतील मुख्य योद्ध्यांची नावे सांगितल्यानंतर मुख्यत: अर्जुनास कुळनाशाच्या शंकेमुळे उत्पन्न झालेल्या मोहयुक्त विषादाचे यात वर्णन आहे.

।। अथ प्रथमोऽध्याय: ।।

  • धृतराष्ट्र उवाच :

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव: ।
मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ।।1।।

  • धृतराष्ट्र म्हणाला : हे संजय ! धर्मभूमी कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूचे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले होते, त्यांनी आतापर्यंत काय केले ते मला सांग.
  • संजय उवाच :

दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ।।2।।

  • संजय म्हणाला : हे राजन् ! पांडवांचे व्यूहरचनेने सज्ज असलेले सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यांना म्हणाला.

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ।।3।।

  • हे आचार्य ! तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नने व्यूहरचना केलेली ही पांडवांची विशाल सेना पहा.

अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ: ।।4।।
धृष्टकेतुश्चेकितान: काशिराजश्च वीर्यवान् ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगव: ।।5।।
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा: ।।6।।

  • या सेनेत भीम व अर्जुन यांच्यासारखे अनेक शूरवीर आणि महाधनुर्धर आहेत. सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी काशिराज, पुरुजित, कुंतिभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, बलवान उत्तमौजा, सुभद्रानंदन अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाचही पुत्र – हे सर्वच महारथी आहेत.

अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ।।7।।

  • हे ब्राह्मणश्रेष्ठ ! आता आमच्यापैकी जे माझ्या सैन्याचे महत्त्वाचे सेनानी आहेत, ते लक्षात घ्या. तुमच्या माहितीकरिता मी त्यांची नावे सांगतो.

भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय: ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ।।8।।

  • येथे तुम्ही स्वत: आणि पितामह भीष्म, कर्ण, संग्रामविजयी कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्तकुमार भूरिश्रवा आहेत.

अन्ये च बहव: शूरा मदर्थे त्यक्तजीविता: ।
नानाशस्त्रप्रहरणा: सर्वे युद्धविशारदा: ।।9।।

  • याशिवाय निरनिराळ्या शस्त्रास्त्रविद्यांत निष्णात व युद्धकलेत कुशल असे इतर पुष्कळ शूरवीर आहेत. हे सर्वच माझ्यासाठी जीवावर उदार झालेले आहेत.

अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ।।10।।

  • भीष्मांनी सर्वतोपरी रक्षण केलेले हे आपले सैन्य अमर्याद आहे, तर भीमाने रक्षण केलेले पांडवांचे सैन्य मर्यादित आहे.

अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिता: ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त: सर्व एव हि ।।11।।

  • तुम्ही सर्वांनी सर्व व्यूहद्वारांवर नेमून दिल्याप्रमाणे ठामपणे उभे राहून पितामह भीष्मांचेच सर्व दृष्टींनी रक्षण करावे.
  • संजय उवाच :

तस्य संजनयन्हर्षं कुरुवृद्ध: पितामह: ।
सिंहनादं विनद्योच्चै: शंखं दध्मौ प्रतापवान् ।।12।।

  • संजय म्हणाला : हे राजन् ! कुरुवंशातील सर्वांत वयोवृद्ध, महापराक्रमी भीष्मपितामहांनी दुर्योधनाला आनंदित करण्यासाठी प्रचंड सिंहगर्जना करून जोराने आपला शंख फुंकला.

तत: शंखाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखा: ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ।।13।।

  • त्यानंतर अनेक शंख, नौबती, डंके, ढोल आणि तुताऱ्या एकाच वेळी वाजू लागल्या. त्या आवाजाने प्रचंड हलकल्लोळ माजला.

तत: श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधव: पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतु: ।।14।।

  • त्याचवेळी शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या भगवान श्रीकृष्णांनी आणि अर्जुनाने दिव्य शंख फुंकले.

पांचजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनंजय: ।
पौण्ड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदर: ।।15।।

  • हृषीकेशांनी पांचजन्य, अर्जुनाने देवदत्त आणि भयंकर कर्म करणाऱ्या भीमाने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजविला.

अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिर: ।
नकुल: सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ।।16।।

  • कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय, नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला.

काश्यश्च परमेष्वास: शिखण्डी च महारथ:।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजित: ।।17।।
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश: पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहु: शंखान्दध्मु: पृथक्पृथक् ।।18।।

  • हे राजन् ! महाधनुर्धर काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, अजिंक्य सात्यकी, द्रुपद, द्रौपदीपुत्र आणि महाबाहू अभिमन्यू यांनी आपापले निरनिराळे शंख वाजविले.

स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ।।19।।

  • आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकणाऱ्या त्या तुंबळ आवाजाने कौरवांची हृदये भेदून टाकली.

अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वज: ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डव: ।।20।।
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।

  • अर्जुन उवाच :

सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ।।21।।
यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ।।22।।

  • हे राजन् ! ज्याच्या ध्वजस्तंभावर हनुमंत आहेत अशा अर्जुनाने धनुष्य हाती घेऊन व्यूहरचनेतील कौरवांकडे पाहून भगवान श्रीकृष्णांना म्हटले :
    हे अच्युत ! माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा म्हणजे युद्धाच्या इच्छेने येथे उभ्या ठाकलेल्या आणि ज्यांच्याशी मला लढावे लागणार आहे, त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन

योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागता: ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षव: ।।23।।

  • दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात कल्याण इच्छिणारे जे जे हे राजेलोक या ठिकाणी आले आहेत, त्यांना मला पहायचे आहे.
  • संजय उवाच :

एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ।।24।।
भीष्मद्रोणप्रमुखत: सर्वेषां च महीक्षिताम् ।
उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति ।।25।।

  • संजय म्हणाला : राजन् ! अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आपला उत्तम रथ उभा केला आणि भीष्म, द्रोणाचार्य व सर्व राजेलोकांच्या उपस्थितीत म्हटले की हे पार्थ ! युद्धासाठी येथे जमलेल्या या सर्व कौरवांना पहा.

तत्रापश्यत्स्थितान् पार्थः पितृनथ पितामहान् ।
आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ।।26।।
श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
तान्समीक्ष्य स कौन्तेय: सर्वान्बन्धूनवस्थितान् ।।27।।
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् ।

  • यानंतर पार्थाने दोन्ही सैन्यांत असलेले आपले वाडवडील, आजोबा, आचार्य, काका, मामा, भाऊ, पुत्र, नातू, मित्र, सासरे व हितचिंतक यांना पाहिले. तेथे उपस्थित त्या सर्व मित्रांना व नातेवाइकांना पाहून कुंतीपुत्र अर्जुन करुणेने अत्यंत व्याकूळ झाला आणि खिन्न होऊन असे म्हणाला.
  • अर्जुन उवाच :

दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ।।28।।
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ।।29।।

  • अर्जुन म्हणाला : हे श्रीकृष्ण ! युद्धासाठी जमलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत, घशाला कोरड पडली आहे. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे आणि माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत.

गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मन: ।।30।।

  • हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि अंगाची जळजळ होत आहे. माझे मन चक्रावून गेले आहे, त्यामुळे मला येथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही.

निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ।।31।।

  • हे केशव ! मला फक्त विपरित घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. या युद्धात माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे व कसे कल्याण होणार आहे, हेसुद्धा मला कळत नाही.

न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ।।32।।

  • हे कृष्ण ! मला तर विजयाची तसेच राज्य व सुखाचीही इच्छा नाही. हे गोविंद ! यांचा वध करून आम्हाला राज्य काय करायचे ? भोगसाधने काय करायची ? किंवा जगून तरी काय करायचे ?

येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा: सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ।।33।।

  • ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, भोग व सुखाची इच्छा करावी तेच हे सगळे आपल्या धन-संपत्तीची व प्राणांची आशा सोडून युद्धाला उभे ठाकले आहेत.

आचार्याः पितर: पुत्रास्तथैव च पितामहा: ।
मातुला: श्वशुरा: पौत्रा: श्याला: सम्बन्धिनस्तथा ।।34।।

  • ते सर्व गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे व इतर नातलगच आहेत.

एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ।।35।।

  • हे मधुसूदन ! यांनी मला मारले तरी बेहत्तर परंतु पृथ्वीच काय तर त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू इच्छित नाही.

निहत्य धार्तराष्ट्रान्न: का प्रीति: स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिन: ।।36।।

  • हे जनार्दन ! कौरवांना मारून आम्हाला कोणता आनंद मिळणार आहे ? या आततायींना मारून तर आम्हाला पापच लागणार आहे.

तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिन: स्याम माधव ।।37।।

  • म्हणून हे माधव ! आपलेच बांधव असलेल्या कौरवांना मारणे मला योग्य वाटत नाही, कारण आपल्याच कुटुंबीयांना मारून आम्ही सुखी तरी कसे होऊ ?

यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतस: ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ।।38।।
कथं न ज्ञेयमस्माभि: पापादस्मान्निवर्तितुम् ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ।।39।।

  • जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या या लोकांना कुळक्षयाचा दोष व मित्रद्रोहाचे पातक दिसत नसले, तरी हे जनार्दन ! कुळनाशाचा दोष जाणणारे आम्ही या पापापासून दूर राहण्याचा विचार का बरे करू नये ?

कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा: सनातना: ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ।।40।।

  • कुळनाश झाल्याने पूर्वापार चालत आलेले कुळधर्म नष्ट होतात आणि कुळधर्म नाहीसे झाल्याने त्या संपूर्ण कुळात अधर्म पसरतो.

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय: ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर: ।।41।।

  • हे कृष्ण ! कुळात जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रियांकडून स्वैर वर्तन घडते आणि हे वार्ष्णेय ! स्त्रिया बिघडल्यामुळे जातींची सरमिसळ होते आणि वर्णसंकर उत्पन्न होतो.

संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रिया: ।।42।।

  • वर्णसंकरामुळे त्या कुळाला आणि कुळाचा घात करणाऱ्यांना नरकातच जावे लागते. एवढेच नव्हे तर पिंडदान, तिलोदक इत्यादी न मिळाल्याने त्या कुळातील पितरांचीही अधोगती होते.

दोषैरेतै: कुलघ्नानां वर्णसंकरकारकै: ।
उत्साद्यन्ते जातिधर्मा: कुलधर्माश्च शाश्वता: ।।43।।

  • वर्णसंकर घडविणाऱ्या दोषांमुळे कुळघातक्यांचे सनातन (पूर्वापार चालत आलेले) जातिधर्म व कुळधर्म नाहीसे होतात.

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ।।44।।

  • हे जनार्दन ! ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत, अशा लोकांना दीर्घकाळ नरकवास भोगावा लागतो, असे आम्ही ऐकत आलो आहोत.

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यता: ।।45।।

  • अरेरे ! किती खेदाची गोष्ट आहे की जाणत असूनही आम्ही हे महापाप करायला तयार झालो आहोत. राज्य व सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांनाच मारण्यास सज्ज झालो आहोत.

यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणय: ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ।।46।।

  • जर शस्त्रधारी कौरवांनी मज निःशस्त्र व प्रतिकार न करणाऱ्याला रणांगणावर मारले तर ते मारणेही मला अधिक सुखावह वाटेल.
  • संजय उवाच :

एवमुक्त्वार्जुन: संख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानस: ।।47।।

  • संजय म्हणाला : एवढे बोलून रणभूमीवर शोकाकुल झालेल्या अर्जुनाने धनुष्यबाण बाजूला टाकले आणि योद्ध्याच्या आसनावरून उडी मारून खाली सारथ्याच्या आसनाजवळ जाऊन बसला.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्याय: ।।1।।

अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या व योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘अर्जुनविषादयोग’ नामक पहिला अध्याय संपूर्ण झाला.

Bhagavad Gita Chapter 1 in Marathi Free Download PDF